Heavy Rain : कर्जत : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सीना नदीस (Sina River) आलेल्या महापूरामुळे कर्जत तालुक्यातील ११८ गावातील २१ हजार ८८३ शेतकऱ्यांचे १५ हजार ६७ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यापैकी पूर (Flood) आणि पाझर तलाव फुटून शेतजमीन खरडून जाने यात १२ गावांच्या २०४ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे १२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. २५ सप्टेंबर अखेर कर्जत तालुक्यातील १६ हजार ५०९ शेतकऱ्यांचे १२ हजार ३९५ हेक्टरी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली.
अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे
तलाव फुटून वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्त्यांचे नुकसान
१४, १५, २२ आणि २३ सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील १० महसुली मंडळ क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीस आलेल्या महापूर तसेच चिलवडी-होलेवाडी येथील पाझर तलाव फुटून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमीन खरडणे, उभे पीक पाण्याखाली जाणे, काढलेली पीके वाहून जाणे यासह काही मोजकी कुटुंबाच्या घरात पाणी घुसून पडझड होण्याचे प्रकार घडले. पूर परिस्थिती आणि तलाव फुटून वाड्या-वस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्त्याचे देखील नुकसान झाले असल्याची नोंद शासन दरबारी पहावयास मिळते. चार दिवसांच्या या अस्मानी संकटात २१ हजार ८८३ शेतकऱ्यांचे एकूण १५ हजार ६७ हेक्टर शेतीपीक आणि जमिनीचे नुकसान झाले आहे. यात पाझर तलाव फुटणे आणि पूर परिस्थितीने २०४ शेतकऱ्यांचे १२६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील महापूर परिस्थितीने ९१ कुटुंबाचे एकूण ४१६ व्यक्तीचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर १४९ पशुधन देखील स्थलांतर केले. तसेच एकूण ७ घरांचे नुकसान झाले असून यात ३ अंशतः आणि ४ पूर्णतः असा समावेश आहे.
नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक
शेतकरी, नागरिकांना तात्काळ भरपाई देण्याची सूचना (Heavy Rain)
कर्जत तालुक्यातील अतिवृष्टी आणि सीना नदीस आलेल्या महापूराने नुकसानग्रस्त भागाची पाहणी खासदार निलेश लंके, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, आमदार रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागास प्रत्यक्ष बांधावर जात पाहणी करून जिल्हा आणि स्थानिक तालुका प्रशासनास तातडीने पंचनामे करून बाधित शेतकरी आणि नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई कशी उपलब्ध होईल याबाबत सूचना दिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील मलठण येथील जिराफ वस्तीत पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची तुकडी देखील उपलब्ध करण्यात आली होती.
कर्जत तालुक्यातील एकूण पडलेला पाऊस (Heavy Rain)
कर्जत तालुक्यातील बहुतांश गावात यंदा अवकाळी आणि मान्सून पावसाने चांगलीच हजेरी देत दाणादाण उडवून टाकली. जून ते २३ सप्टेंबर अखेर कर्जत तालुक्यातील १० महसुली मंडळ क्षेत्रात एकूण पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कर्जत ५९२ मिमी, राशीन ५५० मिमी, भांबोरा ४५२ मिमी, कोंभळी ८३७ मिमी, मिरजगाव ८३४ मिमी, माही ६६१ मिमी, कुळधरण ३७९ मिमी, वालवड ५९२ मिमी, खेड ४६१ मिमी आणि कोरेगाव ५१२ मिमी पावसाची नोंद आहे. कर्जत तालुक्यात सरासरी एकूण ५८७ मिमी पावसाची नोंद आहे. तर मे महिन्यात १४ दिवसांत अवकाळी पावसाने साडेतीनशे मिमी टप्पा ओलांडला होता. मागील आठवड्यात पडलेल्या अतिवृष्टीने आणि सीनानदीस आलेल्या महापुराने कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे शासन नियमानुसार युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. मनुष्यबळ कमी होते. बाहेरील अतिरिक्त कर्मचारी मागवत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसानीची मोजदाद सुरू असून याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार काम सुरू आहे. पंचनाम्यातून नुकसान झालेला एक ही शेतकरी सुटणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे, अशी माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिली.