Ajit Pawar : पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) ९० हजार रूपये देण्याचं काम आम्ही करणार आहोत. फक्त पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला निवडून द्या,असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज पुण्यातील बालेवाडीत (Balevadi) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी जमलेल्या बहिणींशी संवाद साधताना हे विधान केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
नक्की वाचा : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता,मराठवाड्यासह महाराष्ट्रातील ‘या’जिल्ह्यांना यलो अलर्ट
आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठवळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा ९० हजार रूपये देण्याचं काम करू. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.
‘फक्त बहिणीकडे नव्हे तर भावाकडेही लक्ष दिल आहे’ (Ajit Pawar)
अख्खा महाराष्ट्र लाडकी बहिणमय झाला आहे, आमच्या मनात काही वेगळी भावना नव्हती. अर्थसंकल्प मांडताना आमची बहीण,महिला सक्षम झाली पाहिजे, असं आम्हाला वाटतं होतं. विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकलं नाही, मग काय करायच असं विरोधकांना वाटायला लागलं, असा हल्लाबोल अजित पवारांनी विरोधकांवर केला आहे.
या योजनेचे सातत्य टिकवायचं आहे, त्यासाठी महायुतीला पाठबळ द्या. पुढील पाच वर्षात ९० हजार रुपये मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत असच खोटं बोलून नेरेटिव्ह सेट केला गेला. मात्र त्याला तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन देखील यावेळी अजित पवारांनी केलं आहे.
अवश्य वाचा : वैद्यकीय सेवा आज राहणार बंद; डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
‘महिलांना सबळ करण्यासाठी लाडकी बहीण योजना’ (Ajit Pawar)
लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत. महिलांना सबळ करण्यासाठी ही योजना आणली आहे. आमच्या राजकीय जीवनातला आनंदाचा दिवस आजचा आहे. पुढेही या योजनेत सातत्य राहणार आहे. पुढील पाच वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळाकडे लक्ष द्यावं लागेल. केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे, असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.