
डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
Akshay Kardile : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri Assembly By-election) पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचार नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil), आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) तसेच उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्राजक्त तनपुरे यांनी दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद
यावेळी बोलताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यात बारामती व राहुरी येथे पोटनिवडणुका होत असून महाविकास आघाडीने बारामतीसाठी जो निकष लावला, तो राहुरीसाठी लावला नाही. मुख्यमंत्री आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा होऊनही महाविकास आघाडीने उमेदवार दिला, हे पवारांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. विखे कुटुंबाने अनेक वर्ष जनतेची सेवा केली असून जनतेच्या आशीर्वादाने अक्षय कर्डिले हे निश्चित आमदार होतील. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दल दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद आहे.
जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विखे पाटील पुढे म्हणाले की, (Akshay Kardile)
केरळमधील प्रचाराचा अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, भाजपाचे मताधिक्य नक्कीच वाढणार असून मागील निवडणुकीत १६ टक्के मते मिळाली होती, ती यावेळी ४० टक्क्यांपर्यंत जातील. यावेळी त्यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर उपरोधिक टीका करत न्यायालयाने माझी याचिका फेटाळली याचे दुःख झाले, मी दोन दिवस जेवलो नाही, असा टोला लगावला.
साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी संघर्ष करून ही योजना पुढे नेली. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न होते की शेतकऱ्यांची शेती बागायत व्हावी. त्या योजनेसाठी निधी मंजूर करून आणण्यात आला असून याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.
तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, राहुरी पोटनिवडणूक ताकदीने लढवा, कोणीही गाफील राहू नका. सर्वांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा मजबूत करा. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी २५ ते ३० वर्षे नगर तालुका एकसंघ ठेवला. त्यांच्या जनसेवेची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या विकासकामांवर मत मागा. अक्षय कर्डिले यांना आमदार करून त्यांचे स्वप्न पूर्ण करा.
या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितले की, “बारामती व राहुरी पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.
उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. या बैठकीस बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, उपसभापती रभाजी सुळ, जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग, अमोल गाडे, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले, जालिंदर कदम, संतोष मस्के, अभिलाष घिगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


