नगर : आषाढ महिना जवळ येत असल्याने सगळ्यांनाच वारीचे (Ashadhi wari) वेध लागलेत.त्या दृष्टीने सरकारने ही वारीची तयारी सुरु केली आहे.आता आषाढीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी (Toll exemption for vehicles) मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.तसेच,वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील,असंही त्यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला
आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२८) सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारीचा मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम,खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून द्यावेत अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
अवश्य वाचा : ‘सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ’;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी (Ashadhi Wari)
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिलेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वारीसाठी नोडल अधिकारी नेमणार (Ashadhi Wari)
मागील वर्षी वारीदरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल,पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा,यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही,यासाठी प्रयत्न केला जाईल,यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी ,हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.