BJP : भाजपचा उमेदवार लढविणार शिर्डी मतदारसंघाची जागा

BJP : भाजपचा उमेदवार लढविणार शिर्डी मतदारसंघाची जागा

0
BJP

BJP : नगर : शिर्डी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात महायुतीकडून कोण निवडणूक लढणार यावर सध्या जोरदार दावे-प्रतिदावे सुरू आहेत. महायुतीतील भाजपच्या (BJP) मित्र पक्षांकडे कोणीही सक्षम उमेदवार दिसत नसल्याने अखेर भाजपनेच ही जागा लढवावी, अशी तयारी आता सुरू झाल्याचे समजते. भाजपची लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) ४०० पार करण्याची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने युतीला ‘महा’ करण्यात येत आहे. भाजप, शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे (MNS), प्रहार जनशक्ती अशी भलीमोठी मोट बांधण्यात येत आहे.

नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार

शिर्डीची निवडणूक कोणी लढवावी यावर खलबते (BJP)

भाजपने नगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. ते विद्यमान खासदार आहे. नाव घोषित होताच विखे गट प्रचारालाही लागला आहे. मात्र, शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक कोणी लढवावी यावर खलबते सुरू आहेत. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे शिर्डीत विद्यामान खासदार आहेत. मात्र, त्यांचे नाव मागे पडत आहे. त्यांच्या विजयाबाबत भाजप साशंक आहे. 

हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल

अनेकजण इच्छुक (BJP)


रिपाईचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मतदार संघात निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. आठवले यांनी २००९मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावून पाहिले होते. त्या निवडणुकीतील पराभव ‘आठवून’ भाजप रिपाईला ही जागा सोडण्यास तयार नाही. भाजपला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. सदाशिव लोखंडे हे जरी शिवसेनेकडून दोन वेळा खासदार राहिले असले तरी ते मूळचे भाजपचे आहेत. ते तीन वेळा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते हाशू अडवाणी व भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे ते निकटवर्तीय होते. मुंबईतील चेंबूर परिसरात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघ व भाजपसाठी संघटनात्मक बांधणीचे काम केले होते. मात्र, शिर्डी मतदार संघात त्यांची प्रतिमा डागाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे नाव सध्या मागे पडत आहे.

BJP


मित्र पक्षांकडे सक्षम उमेदवार नसल्याने अखेर भाजपनेच ही जागा लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले आहे. त्यानुसार भाजपने उमेदवार चाचपणीला सुरुवात केल्याचे समजते. भाजप व शिवसेना युतीच्या जागा वाटपात भाजपला ही जागा फक्त दोन वेळाच लढविता आली. १९९६ साली भाजपकडून भीमराव बडदे यांनी निवडणूक लढवत विजय मिळविला तर १९९८मध्ये बडदेंना पराभव पत्करावा लागला. नंतर १९९९ साली भाजप-शिवसेना जागा वाटपात ही जागा शिवसेनेने घेतली. कारण, शिवसेनेकडून तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तेव्हापासून ही जागा शिवसेनेच्या वाट्यालाच येत गेली. २०१४मध्ये शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अचानक शिवबंध तोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा भाजपने शिवसेनेला लोखंडेंचे नाव सुचविले होते. आता तेच वाकचौरे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. या बाबीचा फायदा घेत भाजप नवीन उमेदवार मतदार संघात देण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here