C. P. Radhakrishnan | कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

0
पदवीदान समारंभ C. P. Radhakrishnan 
पदवीदान समारंभ C. P. Radhakrishnan 

C. P. Radhakrishnan  | राहुरी : वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भाव निश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन ( C. P. Radhakrishnan) यांनी केले.

हे वाचा – खेळामुळे संघभावना, नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत – उद्योजक नरेंद्र फिरोदिया

पदवीदान समारंभ (C. P. Radhakrishnan)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीप्रदान समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, नवी दिल्ली येथील कृषी शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यपालांचे ए.डी.सी. अभयसिन्हा देशमुख, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदीप इंगोले, दत्तात्रय उगले, गणेश शिंदे, संजीव भोर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, नियंत्रक सदाशीव पाटील आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव हेमंत सोनार उपस्थित होते.

अवश्य वाचा – इमारती, घरांच्या बांधकामावेळी अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात : शंकर मिसाळ

राज्यपालांचे मार्गदर्शन (C. P. Radhakrishnan)

याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन मार्गदर्शन करतांना म्हणाले, आजचा दिवस हा सर्व पदवीधारक आणि पदक विजेत्यांसाठी अत्यंत आनंदाचा आहे. तुम्ही केवळ पदवीधर नाही, तर भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य आहात. तुम्ही ज्ञान आणि कौशल्याने सज्ज आहात आणि समोरील संधी व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम आहात. जे ज्ञान तुम्ही प्राप्त केले आहे ते प्रात्यक्षिकात उतरविण्याचा प्रयत्न करा. विकसीत भारतामध्ये कृषीचा मोठा वाटा राहणार आहे. हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात. कृषी पदवीधरांनी स्थानिक घटक लक्षात घेऊन पिकांचे वाण विकसित करावे. विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि अचूक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती पुरविणे गरजेचे आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन आणि कृषी मूल्य साखळी विकसितकरणेही महत्वाचे आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासन शेतीतील नवीन उपक्रम, उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आर्थिक सहकार्य, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे शेती क्षेत्रातील पुढील नेतृत्व घडविण्याचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 

याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती माणिकराव कोकाटे म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. नव्या कल्पना, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती पद्धतीत बदल घडवून आणावे लागतील. फलोत्पादन आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करून निर्यातीवर भर देणेही गरजेचे आहे. अधिक उत्पादनासाठी वारेमाप खते व किटकनाशकांच्या वापरामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. अंशमुक्त कृषी उत्पादनाकडे आता जाणे गरजेचे आहे. विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तारामध्ये भरीव योगदान द्यावे आणि कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. राज्य शासन विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कुलगुरू डॉ. शरद गडाख विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. 

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी 40 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 331 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,830 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 5,201 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीप्रदान सन 2023-24 मध्ये बी.एस्स.सी (कृषी) पदवीत प्रथम आलेली प्रज्ञा खर्डे, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली प्राची महाकाळ, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला दर्शन सुर्यवंशी यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 9 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते पदव्युत्तर व कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदन आणि दिप प्रज्वलनाने करण्यात आली. पदवीप्रदान समारंभाला अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वाष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, तानाजी धसाळ, कृषिभुषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here