Devendra Fadnavis | नगर : दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. यात एकट्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. याद्वारे १८ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ७५ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
हेही वाचा – अमेरिकेवर भारताचा दणदणीत विजय; टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन (Devendra Fadnavis)
सुपा (ता. पारनेर) एमआयडीसी येथे ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गिते व थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा – मोदी संघाचे पण, त्यांचा पक्ष संघापासून वेगळा; डॉ. मोहन भागवत यांची भूमिका
महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक (Devendra Fadnavis)
इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुंतवणूक येत असल्याचे नमूद करीत, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते, त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गिते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

राज्याची औद्योगिक प्रगती (Devendra Fadnavis)
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा भर आहे. पूर्वी राज्याची औद्योगिक प्रगती केवळ मुंबई, एमएमआर व पुणे या भागांपुरती मर्यादित होती. ती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुपा एमआयडीसी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. केवळ सामंजस्य करार करून न थांबता, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दावोसमध्ये २०२५ मध्ये करण्यात आलेला करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आला आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल (Devendra Fadnavis)
ते पुढे म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेने ११ व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासात तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्राचा वाटा मोलाचा ठरणार आहे. या प्रवासात महाराष्ट्र भक्कम पाऊले टाकत आहे. दावोस दौऱ्यात १६ लाख कोटींचे करार करण्यात आले असून, त्यातील ७५ टक्के करार हे अंमलबजावणीच्या मार्गावर आहेत.

केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाही, तर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. या प्रकल्पात ‘सस्टेनेबल कास्टिंग’ व ‘रिसायकलिंग’वर भर देण्यात आला असून, राज्यात ‘उद्योग व पर्यावरण’ हातात हात घालून पुढे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावे (Devendra Fadnavis)
उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहन करत फडणवीस यांनी उद्योगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, उद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे स्थिर राहतील किंवा कमी होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, औद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद – उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले , दावोसमध्ये झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले आहेत, हे राज्यासाठी भूषणावह आहे. एका मराठी उद्योजकाने परदेशी भागीदारांच्या सहकार्याने ५०० कोटींची उलाढाल करणारा उद्योग उभा करणे हे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
लोथर थोनी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात गिते यांनी तौरल इंडिया प्रकल्पाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री, नारायण गडाचे शिवाजी महाराज आदी उपस्थित होते.



