Dr. Pankaj Ashiya : नगर : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदनशीलपणे काम करावे. समाजामध्ये त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाच्या (Government) सर्व योजनांचा तृतीयपंथीयांना (Transgender) प्राधान्याने लाभ देऊन देशासह राज्यात जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
नक्की वाचा : करंजी घाटात विचित्र अपघात; ट्रकची एकाच वेळी पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी
कार्यशाळेला उपस्थिती
कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, लेखिका-कवयित्री पिंकी शेख, जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य काजलगुरु नगरवाले, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, समाजकल्याण निरीक्षक संगीता चितळे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)
समाजामध्ये तृतीयपंथीयांबाबत अनेक गैरसमज आहेत. समाजाचा त्यांच्याविषयीचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी भिक्षेवर गुजराण करावी लागते. तृतीयपंथीयांना त्यांच्या पायावर उभे राहून समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात यावे. उद्योग उभारणीसाठी दायित्व निधीतूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आजपर्यंत जिल्ह्यात २०० तृतीयपंथीयांची नोंदणी झाली असून, ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही, त्यांची नोंदणी करून घेण्यात येईल. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक देऊन शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, शासकीय सेवेच्या कालावधीत अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच अनुभवतो आहे. तृतीयपंथीय हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक तृतीयपंथीयापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य काजलगुरु नगरवाले म्हणाल्या, तृतीयपंथीयांनाही समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बहुतांश तृतीयपंथीय निरक्षर असल्याने अनेकवेळा शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येतात. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी तृतीयपंथीयांप्रती संवेदनशील राहून, शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांना मदत करावी. त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्यावा, असे त्या म्हणाल्या.
पिंकी शेख म्हणाल्या, तृतीयपंथीय समुदायावर अजूनही अनेक प्रकारची सामाजिक, मानसिक व आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यांना शिक्षण, रोजगार व आरोग्यसेवेत समान संधी मिळणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या दृष्टिकोनात बदल घडवणे हीच खरी गरज आहे. लैंगिकता ही व्यक्तीची ओळख असते. ती केवळ स्त्री किंवा पुरुष या परंपरागत चौकटीत मावणारी नसते. समलैंगिक, उभयलिंगी, तृतीयपंथीय व ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समाजात सकारात्मक स्वीकार व्हावा, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
प्रस्ताविकात सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार म्हणाले, तृतीयपंथीयांना शासन योजनांच्या लाभातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ही कार्यशाळा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. संविधानाने सर्वांना समान संधी व हक्क दिलेले आहेत. परंतु तृतीयपंथीयांना आजही अनेक ठिकाणी उपेक्षा, भेदभाव व असमानतेला सामोरे जावे लागते. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांची ऑनलाईन नोंदणी, संजय गांधी निराधार अनुदान, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका यांसारख्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यात तृतीयपंथीयांसाठी घरकुल संकुल व स्मशानभूमीसाठी ३ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृतीयपंथीयांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी मौजे चितळी येथे शेळीपालन व्यवसायही सुरू करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले, तर आभारप्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक संगीता चितळे यांनी केले. कार्यशाळेला सर्व विभाग प्रमुख तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.