Eknath Shinde : लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
Eknath Shinde

Eknath Shinde : नगर :  बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. यामाध्यमातून चार लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ आहे. यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्याच्या (Namo Maharojgar Melava) माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे व्यक्त केली. 

हे देखील वाचा: मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

शिबिरास दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत केले मार्गदर्शन (Eknath Shinde)


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍ील सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?

नगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा (Eknath Shinde)

राज्यात नागपूर, लातूर नंतर नगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, ”शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.

५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, ”राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे.  राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५०  तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे  रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री लाेढा म्हणाले की, ”पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व नगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत नगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

ज‍िल्ह्यात  २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार : राधाकृष्ण व‍िखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ”औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली. संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व नगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी केली.

पह‍िल्या द‍िवशी १० तरूणांना न‍ियुक्ती पत्र

भिस्तबाग महाल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या होत्या. या रोजगार मेळाव्याच्या पह‍िल्या द‍िवशी पाच ज‍िल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रत‍िसाद द‍िला.  महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यात पहिल्याच दिवशी १० तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले.


खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ”महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल, असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍ीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून नगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आाहे.”

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ”या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. या मेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे.”

कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही युवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍ील सैंदाणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here