Eknath Shinde: “मी आरोपांवर उत्तर देत नाही. मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. त्याचा फायदा म्हणजे आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुणाल कामराने (Kunal Kamara) गाण्यातून केलेल्या आरोपांवर दिली आहे.विनोदी कलाकार कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या एका गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
नक्की वाचा : कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत;पोस्टमध्ये नेमकं काय ?
‘हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर सुपारी घेऊन केलेले आरोप आहेत’ (Eknath Shinde)
ते पुढे म्हणाले की,“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो. विडंबन अनेक कवी करायचे.मात्र हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलंय बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलंय, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलंय बघा, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर भांडला. त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाईन्समध्ये बाहेर केलंय. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही”,असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अवश्य वाचा : कुणाल कामराच्या गाण्याच्या वादावरून देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
‘मी कामातून उत्तर देणारा माणूस’ (Eknath Shinde)
“मी या विषयावर बोललोच नाही. मी बोलणारच नाही. मी काम करणारा माणूस आहे. मी संवेदनशील आहे. माझ्यात सहन करण्याची ताकद आहे. मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही, मी शांत राहणं, आपलं काम करणं,आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं योग्य मानतो. हे केल्याने देदीप्यमान यश आपण पाहतोय”,असंही ते म्हणाले.