Farm Road : तहसीलदारांच्या पुढाकारातून शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले;शेतकऱ्यांच्या ‘बांधावरच न्याय निवाड्याचा’ कोपरगाव पॅटर्न!

Farm Road : तहसीलदारांच्या पुढाकारातून शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले;शेतकऱ्यांच्या 'बांधावरच न्याय निवाड्याचा' कोपरगाव पॅटर्न!

0
Farm Road : तहसीलदारांच्या पुढाकारातून शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले;शेतकऱ्यांच्या 'बांधावरच न्याय निवाड्याचा' कोपरगाव पॅटर्न!
Farm Road : तहसीलदारांच्या पुढाकारातून शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले;शेतकऱ्यांच्या 'बांधावरच न्याय निवाड्याचा' कोपरगाव पॅटर्न!

Farm Road : नगर : कोपरगाव तालुक्यातील शेत-शिवार रस्त्यांच्या (Farm Road) प्रलंबित प्रकरणावर तहसीलदार (Tehsildar) महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा (Judgment) केला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २ हजार १७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. कोपरगाव तहसीलदार यांच्या ‘बांधावरच न्यायनिवाडा’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ‘कोपरगाव पॅटर्न’ म्हणून राज्यात नावारूपाला आला आहे.

अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे

शेत रस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, कौटुंबिक वाटणी आणि तुकडे यामुळे दरडोई जमीनधारणा कमी होत असून शेत रस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण होतात. त्यामुळे वेळ, श्रम व संसाधनांचा अपव्यय होऊन कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो.

नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

या उपक्रमांतर्गत ६० रस्ते खुले (Farm Road)

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यात गावनकाशानुसार अतिक्रमित किंवा बंद झालेले शिवाररस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग मोकळे करून वादग्रस्त रस्ते प्रत्यक्ष पाहणी द्वारे खुले करण्यात येत आहेत. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ६० रस्ते खुले करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, संवत्सर, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, रवंदे, धोडेंवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जेऊर पाटोदा, धारणगाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, उक्कडगाव, मल्हार वाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगांव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, कासली- शिरसगाव रस्ता, कासली- पढेगाव रस्ता, कासली- उंदीरवाडी रस्ता, सडे व मनेगाव या गावातील शिवार रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.


शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर म्हणाले,“शेतजमिनींचे विभाजन व हस्तांतरणामुळे रस्त्यांवरील वाद वाढले आहेत. प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश असून, तहसीलदार महेश सावंत यांनी ६० प्रकरणे बांधावरच सामोपचाराने निकाली काढली आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचला असून, वाद कायमस्वरूपी मिटल्याने अपील व पुनर्विचार प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.”


तहसीलदार महेश सावंत म्हणाले, ” प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला‌ पाहिजे, असा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम राबविला. शेतकऱ्यांचे एकमेकांमध्ये असलेले वाद सामंजस्याने मिटल्याने जय-पराजयाची भावना राहिली नाही. यामुळे अपीलांचे प्रमाण ही शून्य झाले”


या उपक्रमाचा फायदा घेतलेल्या सडे गावातील शेतकरी विजय पाटील म्हणाले, “गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सतीच्या बांधाचा रस्ता वादग्रस्त होता. तहसीलदार महेश सावंत यांनी दोनदा बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वांच्या सहकार्याने रस्ता खुला केला. या निर्णयामुळे शंभरहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आता सर्वांसाठी खुला झाला आहे. अशा वादांचा निपटारा गावपातळीवर झाल्यास शेतकऱ्यांचे खरे हित साधते.”