Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची एसटी संपाची हाक ठरली फोल; कर्मचाऱ्यांकडून अजिबात प्रतिसाद नाही

गुणरत्न सदावर्तेंची एसटी संपाची हाक ठरली फोल

0

नगर : एसटी (ST) महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग द्यावा, आदी मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने आजपासून (ता. ६) एसटी संपाची (strike) हाक दिली आहे. परंतु, त्यांच्या या हाकेकडे यंदा एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. संपाची घोषणा केल्यानंतरही राज्यातील सर्वच्या सर्व २५० आगारातून १०० टक्के बस फेऱ्या व्यवस्थित सुरू आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंनी पुकारलेला एसटीचा संप फोल ठरल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘विराट’ विजय; २४३ धावांनी केला पराभव

मागील वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला हाेता. यात राज्य सरकारची चांगलीच काेंडी झाली हाेती. याच संपाचे नेतृत्व सदावर्ते यांनी केले हाेती. मात्र, आंदाेलनाला वर्ष झाले, तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या अद्याप मागणी पूर्ण झाली नाही. मात्र, आता सदावर्ते यांनी पुन्हा संपाची हाक दिल्याने सर्वांचे लक्ष लागले हाेते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदाेलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. एसटी कष्टकरी जनसंघाने एसटी संपाची हाक दिल्याने राज्य सरकारने तातडीने पावले उचलली. राज्य सरकारने गुणरत्न सदावर्ते यांच्यासाेबत बैठक बाेलवली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. एसटीचा सामान्य प्रवाशांना फटका बसू नये, यासाठी मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

नक्की वाचा: कुणबी नाेंदी शाेधण्यासाठी जिल्ह्यात विशेष माेहीम सुरू; १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची हाेणार पडताळणी

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची याबाबत सदावर्ते यांनी बातचीत सुरू केली आहे. या एसटी कर्मचाऱ्यांसोबत संपाबाबत बातचीत करणारी सदावर्ते यांची ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये वायरल झालेली आहे. सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते. मात्र, एसटी विलिनीकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे ज्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबर साठे लोटे आहे त्यांनी एसटी महामंडळाला जाब विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना जाब विचारून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, उगाचच स्टंटबाजी करू नये अशी टीका इतर एसटी कर्मचारी संघटनांनी केलेली आहे.