
वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनच्या सूक्ष्म नियोजनासह प्रशासन सज्ज
Hind Di Chadar : नगर : ‘हिंद-दी-चादर’या (Hind Di Chadar) भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव (Principal Secretary to the Chief Minister) श्रीकर परदेशी (Shrikar Pardeshi) यांनीआज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांसाठी फूड स्टॉल, लंगर, आदीबाबत शुद्धता राखत गुणवत्ता ठेवण्याची सूचना केली. तसेच भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
यांची उपस्थिती
बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तरअहवाल सादर केला. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
समूह गाण्याच्या माध्यमातून विश्व विक्रमाची नोंद (Hind Di Chadar)
यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली, तसेच सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनकाळावर आधारित जे गीत गायले ते गीत कोकण विभागातील 20 हजार शैक्षणिक संस्थामध्ये 51 लाख विद्यार्थी आणि1 लाख 50 हजार शिक्षण कर्मचाऱ्यांनी सहभागातून समूह गान केले, याची ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रमाची नोंद झाल्याची माहिती दिली. समूह गाण्याच्या माध्यमातून विश्व विक्रमाची नोंद झाल्याबद्दल डॉ. परदेशी यांनी कोंकण विभागीयआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे व सर्व सहकारी, अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर सिंघ साहिबजी यांच्या शिकवणीवर आधारित एकूण 13 लेख 13 भाषांमध्ये ई-बुक स्वरुपात प्रकाशित केले जाणार आहे, याचीही डॉ. सूर्यवंशी यांनी डॉ.परदेशी यांना माहिती दिली.

कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्ग योजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी 5 तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये 350 खाटा आणि 75 आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीयपथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर,नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे 5 लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात 80 हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाश योजना यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे सर्व कामे सुरु आहेत.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने कोणत्याही अनुचित प्रकार होवू नये यासाठी सायबर पोलीस, एटीएसची मदत घेण्याच्या सूचना देत डॉ.परदेशी म्हणाले की, मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने भाविकांना रस्त्यांची माहिती होण्यासाठी रस्ते दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असेही प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर “हिंद दी चादर” कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत. देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी 30 पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. जेएनपीए परिसरात दररोज सुमारे 25 हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी 01 हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित याबैठकीस “हिंद दी चादर” शहिदी समागम राज्य समितीचे मुख्य समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, कोकण विभागातील इतर जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका,पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


