नगर : महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला (Ladki Bahin Yojana) यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. मात्र आता या योजनेत सहभागी असलेल्या महिलांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने सुमारे ८० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द (Application Cancellation) केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या महिलांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचे पोर्टलही बंद (Portal Closed) करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारविरोधात महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
नक्की वाचा : ‘कृषी विभागाला निधी न मिळाल्याने कामे रखडली’, माणिकराव कोकाटेंची विधान परिषदेत कबुली
‘लाडकी बहीण योजनेचा लाभ बोगस लाभार्थ्यांना नाही’ (Ladki Bahin Yojana)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या योजनेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार समोर आले. यानंतर शासनाने अशा बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. शासनाच्या तपासादरम्यान अनेक महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणे थांबवले, तर काही अर्ज शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले. परिणामी, जुलै महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने अनेक महिलांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
अवश्य वाचा : ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित
या महिलांचे अर्ज झाले बाद (Ladki Bahin Yojana)
एखाद्या व्यक्तीचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल, तसेच जर कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या रूपात कार्यरत असेल, तर अशा प्रकरणांमध्ये अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात येत आहे.