
Maharashtra Floods : राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Flood-affected farmers) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जमीनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय (Maharashtra Floods Decision) घेतलाय. पूरग्रस्त जमीनीसाठी गौण खनिजे इत्यादींवर रॉयल्टी माफ (Royalty waiver) करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
नक्की वाचा: ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान (Maharashtra Floods)
अतिवृष्टी आणि पुरामुळे जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या घराचे, पिकांचं आणि जमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सप्टेंबर महिन्यात महापूर आला होता. या पुरात शेतकऱ्यांची पिकं तर वाहून गेलीच मात्र जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. जमिनीला १० ते १५ फुटाचे खड्डे पडलेत. नदीने पाण्याचा प्रवाहच बदलल्यानं सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे. अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मायेचा आधार देण्यासाठी आता राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा: बॉलिवूडचा जुना चेहरा हरपला! अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन
सर्वाधिक नुकसान कुठे ? (Maharashtra Floods)
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे नांदेड, यवतमाळ, वाशीम, धाराशिव, अकोला, सोलापूर आणि बुलढाणा आहेत. राज्यातील एकूण १९५ तालुक्यांमध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून ६५४ महसूल मंडळांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


