Maliwada Bus Stand : नगर : ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी व ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एसटी महामंडळाचे (MSRTC) ब्रीद वाक्य आहे. मात्र, हे ब्रीद वाक्य अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील माळीवाडा बसस्थानकाला लागू होत नसल्याचे दिसत आहे. या बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र सध्या माळीवाडा बस स्थानकात (Maliwada Bus Stand) दिसत आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक हे राज्यातील सर्वात जुने बसस्थानक आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी नवीन इमारतीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराने बसस्थानकाची जुनी इमारत पाडून जमीनदोस्त केली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून त्याचे काम थांबले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यात आता पावसाळा सुरु झाल्याने आणखी समस्यांची भर पडली आहे. संबंधित प्रशासनाने प्रवाशांसाठी फलाट क्रमांक लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कुठे बस लागली आहे, हेही सांगता येत नाही. भर उन्हात तसेच पावसात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. तसेच अस्वच्छतेचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे.
नक्की वाचा : करंजी घाटात विचित्र अपघात; ट्रकची एकाच वेळी पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
माळीवाडा बसस्थानक परिसरात कुठल्या सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचे दिसत आहे. बसस्थानकाच्या दोन्ही गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. एखादी मोठी घटना घडल्यास त्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्नही प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अवश्य वाचा : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा
अवैध धंद्यांचा बसस्थानकाला वेढा (Maliwada Bus Stand)
माळीवाडा बसस्थानक असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात वारंवार पाकिटमारी, चोरी, चेनस्नॅचिंक असे गुन्हे घडत असतात. त्यामुळे माळीवाडा परिसरातील अवैध धंदे पोलीस प्रशासनाने तातडीने बंद करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.