
Marathi Bhasha Gaurav Din : नगर : मराठी (Marathi) ही आपल्या संस्कृतीची व अस्मितेची ओळख असून तिचे जतन व संवर्धनाबरोबरच आपल्या मायबोलीचा अधिक प्रचार, प्रसार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी भारती सागरे, तहसीलदार नागेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, शशिकांत नजान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. ही मान्यता आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची, ऐतिहासिक वारशाची व वैभवशाली साहित्यसंपदेची पावती आहे. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन व प्रसारासाठी सर्व स्तरांवर एकत्रितपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
मातृभाषेतून शिक्षण विकासासाठी महत्त्वाचे (Marathi Bhasha Gaurav Din )
शासनाचे मातृभाषेतून शिक्षण देण्याचे धोरण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रारंभीचे शिक्षण मातृभाषेत झाल्यास विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, विचारशक्ती व सर्जनशीलता अधिक बळकट होते. त्यामुळे मराठी माध्यम अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीची समृद्ध साहित्यपरंपरा तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध उपक्रम, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करून तिच्या अभिवृद्धीत प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्वप्रथम ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमस्थळी मराठी साहित्याचे पुस्तक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


