
Nashik-Pune Semi High-Speed Railway : अकोले : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे (Nashik-Pune Semi High-Speed Railway) अकोल्यातून जावी, या मागणीसाठी देवठाण येथे आज सर्वपक्षीय मागणी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे पत्र पाठवत या मेळाव्याची सुरुवात झाली. रेल्वे आमच्या हक्काची, आमच्या उज्वल भविष्याची या मागणीने पंचक्रोशी दुमदुमून गेली होती. देवेंद्र मामा (Devendra Fadnavis) रेल्वे द्या, विखे मामा (Radhakrishna Vikhe) रेल्वे द्या, किरण मामा रेल्वे द्या, असा आग्रह करणाऱ्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. त्यानंतर मेळावा पार पडला.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी
देवठाण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच एक सभा घेऊन नाशिक – पुणे रेल्वे पूर्वीच्या मार्गानेच होईल व देवठाण येथे स्टेशन देऊनच रेल्वे पुढे जाईल असे आश्वासन दिले होते. एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्पात याबाबत बदललेला मार्ग पुनरस्थापित करण्याची घोषणा झाली नाही तर पालकमंत्र्यांच्या या घोषणेला अर्थ राहणार नाही. पालकमंत्र्यांचे आश्वासन खरे ठरावे यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना भेटून एक फेब्रुवारी पूर्वी याबाबतचा निर्णय करावा. अर्थसंकल्प मांडताना तशी घोषणा दिल्लीमधून होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. तसे झाले तरच पालकमंत्र्यांच्या आश्वासनाला अर्थ राहणार आहे. असे झाले नाही तर एक फेब्रुवारीनंतर वर्षभर पुन्हा या मागणीसाठी थांबावे लागेल व एकप्रकारे निवडणुकीसाठी दिलेले हे आश्वासन ठरेल. असे होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी युद्ध पातळीवर काम करून दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर नाराजी (Nashik-Pune Semi High-Speed Railway)
तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच संगमनेर येथील एका सभेत देवठाण बोटा स्टेशनबाबत वक्तव्य केले होते. अकोल्यातून रेल्वे गेली तर माझी हरकत नाही, अकोल्याचा स्वित्झर्लंड झाला तरी चालेल, बोगद्या बोगद्याने डोंगरदऱ्यातून त्यांनी जरूर रेल्वे न्यावी अशाप्रकारचे वक्तव्य करून संगमनेर तालुक्यातील उसाचे नुकसान रेल्वेसाठी झाले तर तुम्हाला चालेल काय, असा प्रश्न त्यांनी सभेत शेतकऱ्यांना केला होता. त्यांच्या ह्या भूमिकेवर परिषदेमध्ये वक्त्यांकडून नापसंती व्यक्त करण्यात आली. तर मी स्वतः लवकरच पुढाकार घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटेन तसेच दिल्लीला जाऊन सुद्धा जे शक्य असेल ते सर्व करेल व एक फेब्रुवारीच्या आत रेल्वे येण्यासाठी माझे संपूर्ण योगदान देईल, असे आश्वासन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कारभारी उगले होते. विनय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित नवले यांच्यासह अनेकांनी भावना मांडल्या.
हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल


