Nilesh Lanke : अकोले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावाचा केवळ जयघोष नको, तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे, असा ठाम संदेश खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शनिवारी विश्रामगडावरून दिला. आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शिवकालीन किल्ल्यांचे जतन आणि स्वछतेसाठी सुरू केलेल्या अनोख्या मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक विश्रामगड पट्टा किल्ला (Vishramgad Patta Fort) येथे हजारो तरूण-तरूणींच्या सहभागातून पार पडला.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
मोहिमेत हजारो मावळे सहभागी
या मोहिमेत डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, अकोले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गडाख, जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भांगरे, प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे, उमेश डावरे, दत्ता अस्वले, संतोष वारे, आबा पवार, रामेश्वर निमसे, सिताराम काकडे, बाळासाहेब हराळ, नितीन धांडे, मोहिनी काश्मीरी, समीर वडगे यांच्यासह हजारो मावळे सहभागी झाले होते.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
स्वच्छता, वृक्षारोपन, बाके,सौरदिवे बसविण्याची कामे (Nilesh Lanke)
शनिवारी सकाळीच फावडे, कुदळ, झाडू हाती घेत आपला मावळा टी शर्ट घातलेले तरूण-तरूणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. कचरा निर्मूलन, झाडे-झुडपे काढणे, वृक्षारोपन तसेच पर्टकांसाठी बाके, डस्टबिन आणि सौरदिवे बसविण्याची कामे उत्साहात पार पडली.
खासदार लंके यांनी स्वतः हाती झाडू घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून टीका-टिपण्णीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे असे ते म्हणाले. शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही मोहिम आजवर धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड अशा ठिकाणी राबविली गेली असून आता विश्रामगडावर पोहचली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू हे आपल्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहेत. त्या अखंड राहिल्या पाहिजेत, ही मोहिम त्यासाठीच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरूणाने या उपक्रमात सहभागी होउन कृती दाखवावी. केवळ व्यासपीठावर भाषण करून टीका करणे थांबवून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे अशी अपेक्षा खा. लंके यांनी व्यक्त केली. सरकारकडून गडसंवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीदेखील खा. लंके यांनी यावेळी बोलताना दिली.
गडांवरील स्वच्छता, मंदिरे दुरूस्ती, सूचना फलक लावणे अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमातून भविष्यातील पिढयांसाठी स्वच्छ, हिरवेगार गड सोडून जाण्याचा संकल्प खा. लंके यांनी व्यक्त केला. चंद्र-सूर्य असेपर्यंत छत्रपतींचा विचार प्रत्येक तरूणाच्या मनात जागा करत राहील हीच खरी शिवसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवप्रेमी युवकांनी आता केवळ घोषणांपुरते न थांबता, गडरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करावी हा संदेश विश्रामगड मोहिमेतून महाराष्ट्रभर पोहचला.