Police : राहाता : शिर्डी पोलीस, (Police) नगरपरिषद व साईबाबा संस्थान यांनी संयुक्तपणे भिक्षेकर्या (Beggars) विरुद्ध धरपकड मोहीम राबवून महिला व पुरुष मिळून ७२ भिक्षेकर्यांना ताब्यात घेतले. यामध्ये ६० पुरुष तर १२ महिला भिक्षेकर्यांचा समावेश आहे. या सर्वांना पोलीस ठाणे येथे आणून नाश्ता जेवण दिले त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी (Health Checkup) करून न्यायालयाचे (Court) आदेशान्वये पुरुष भिक्षेकर्यांची विसापूर तर महिला भिक्षेकर्यांची रवानगी चेंबूर येथील बेगर होममध्ये रवानगी केली जाणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल
शिर्डी शहर गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्याचा चंग
शिर्डीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी शिर्डी शहर गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्याचा चंग बांधला आहे. ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामसभा घेऊन गुन्हेगारी विरोधात व्यसनाधीन भिकारी व मोफत प्रसाद भोजन आणि अवैध धंद्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. शिर्डी पोलीस ठाण्याला काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी गुन्हेगार तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर बाबींच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळी रणजीत गलांडे साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी खाकी वर्दी ऐवजी साध्या वेशात साईबाबा संस्थांनचे सुरक्षा कर्मचारी नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा ताफा सोबत घेऊन शिर्डी शहरातील चावडी परिसर, द्वारकामाई, परिसर सोळा गुंठे, साई कॉम्प्लेक्स, दोनशे रूम, बसस्थानक परिसर तसेच इतर भागातून व्यसनाधीन झालेले तसेच चित्रविचित्र कपडे घालून साई भक्तांच्या मागे फिरत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या ७२ भिक्षेकर्यांना ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
भिक्षेकऱ्यांमध्ये काही परराज्यातील नागरिक (Police)
या सर्वांना जेवण देऊन त्यांची आरोग्य तपासणी करत कोर्टाच्या परवानगीने पुरुषांची विसापूर येथे तर महिला भिकाऱ्यांची चेंबूर येथे सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे. पुरुष भिक्षेकऱ्यामध्ये परराज्यामधील परंतु शिर्डीत भिक्षा मागणाऱ्यांपैकी कर्नाटक राज्यातील ३, मध्यप्रदेश २, आंध्रप्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल राज्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे भिक्षेकरी आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण १४ भिक्षेकरी असून त्यापैकी ७ भिक्षेकरी राहाता तालुक्यातील आहेत. शिर्डी शहरातील ५, रुई व निमगाव कोऱ्हाळे गावातील प्रत्येकी १ जण आहे मुंबई ४, छत्रपती संभाजीनगर ९, नाशिक ८, पुणे ३, वाशिम २,जळगाव ३, अकोला २ तर बुलढाणा, नांदेड, जालना, बीड, सांगली, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी १ असे मिळून एकूण ६० पुरुष भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिला भिक्षेकर्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून ८ त्यापैकी राहाता तालुक्यातील ६ भिक्षेकरी महिला आहेत. भंडारा जिल्हा १, नाशिक जिल्ह्यातून २ व कर्नाटक राज्यातील१ असे मिळून एकूण १२ महिला भिक्षेकरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती रणजीत गलांडे यांनी दिली.
राणू मंडल, गुल्ल्या, चोपडी ताब्यात (Police)
या भिक्षेकरी लोकांमध्ये शिर्डीतील लोकांनी त्यांच्या वागणुकी नुसार मिश्किल नावे ठेवलेली काही अवलिया भिक्षेकरी सुद्धा आढळून आले त्यात दारू पिऊन गाणे गात फिरणारी “राणू मंडल”..तर कर्णकर्कश शिट्ट्या वाजवत अचानक जमिनीवर लोटांगण घेत कोलांटी उडी मारणारा “गुल्ल्या” .. दिवसा दारू पिऊन भाईगिरी करत कुठेही झोपून जाणारी “चोपडी”..यांसह बिगारी काम करणारे सुद्धा काहींना आपली व्यथा मांडताना दिसून आले. त्यात काही भल्या सकाळी फुल्ल झिंगून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. अचानक झालेल्या कारवाईने अनेकजण मानसिक धक्क्यात असताना चेहरे उतरून बसलेले होते. मात्र, एक भिक्षेकरी इतक्या टेन्शनच्या प्रसंगी निवांत पेपर वाचत बसल्याचे दिसूनआले. तर काहींचे नातेवाईक पोलीस ठाण्याजवळ आपल्या नातेवाईकांना सोडविण्यासाठी कागदपत्र घेऊन हजर असल्याचे सांगितले जाते.