Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
नक्की वाचा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!सोन्याच्या दरात मोठी घसरण
‘लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करा’ (Pune Rain)
पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे पुढे म्हणाले की, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
अवश्य वाचा : ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे
नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांचे आवाहन (Pune Rain)
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा इशारा दिल्याने या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.