
Radhakrishna Vikhe Patil : नगर : महायुतीच्या (Mahayuti) वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका (Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) महायुती म्हणून एकत्रित लढविण्याबाबत चर्चा करणार आहोत. महायुती म्हणून निवडणुकांना समोरे जाण्याचा माझा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना
सावेडी येथील प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मंगळवारी (ता. १६) सांयकाळी ढोल पथकांच्यावतीने तालबद्ध वादनाने मानवंदना देण्यात आली. यावेळी शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. चौकात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमानंतर विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, संपत बारस्कर, निखिल वारे, अविनाश घुले, सागर बेग, विनायक देशमुख, शिवशाहीर चंद्रकांत माने, शैलेश थोरात, उद्धव काळापहाड आदींसह स्मारक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
महायुतीत निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा (Radhakrishna Vikhe Patil)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगितले आहे. अहिल्यानगर महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवावी, अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशीच युती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर परिणाम होईल का? याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आले म्हणून परिणाम होत नसतो. जनतेचा विश्वास सरकारवर आणि केलेल्या कामावर आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही. पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची चर्चा आहे, याबाबत विखे पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावे किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. अशा वेळी इतर घटकासोबत जाणे योग्य नाही.


