Radhakrishna Vikhe Patil : नगर : शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती (Agriculture) पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (Artificial Intelligence) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने (Department of Agriculture) कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
सन २०२५ -२६ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सन २०२५ -२६ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार अमोल खतले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सातत्याने मार्गदर्शन दिले जात आहे. हवामानातील बदल, जमिनीची गुणवत्ता, योग्य पीक निवड, सिंचन पद्धती, खतांचे प्रमाण या बाबींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. तालुकास्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व बैठकांचे आयोजन करून या बैठकीत तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करावा. या बैठकीस शेतकऱ्यांना आमंत्रित करावे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना निर्भेळ, दर्जेदार व पुरेशा प्रमाणात खते व बी-बियाणे मिळतील याची काळजी घ्यावी. अकोले तालुक्यात भाताचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक कृषी केंद्राबाहेर बियाणे व खते यांचा पुरवठा व शिल्लक साठा दर्शवणारा फलक लावावा. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांवर कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत झालेल्या बदलांचे सांख्यिकीय परीक्षण करावे. पीक विमा पद्धतीतील बदलांची सर्वदूर माहिती व्हावी यासाठी व्यापक जनजागृती करावी.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शेतीत होत असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी पर्यटन योजना सुरू करण्यासाठी कृषीमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शेती उत्पादनाबरोबरच माल निर्यातीमध्ये जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी पायाभूत सुविधा निर्माणावर भर द्यावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेस पात्र शेतकऱ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेले नियोजन व विविध योजनांची अंमलबजावणी याचे सादरीकरण केले. यावेळी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.