Radhakrishna Vikhe Patil : राहाता : महसूल (Revenue) हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
‘महसूल सप्ताह – २०२५’
राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, डॉ.स्वाधिन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
“महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले. शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करण्यात आला. तसेच भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करण्यात आल्या. महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या.” “नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल कर्मचारीच नागरिकांना सर्वप्रथम मदत करण्यासाठी धाव घेतो. त्यामुळे या विभागाचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच ओढे-नाल्यावरील अतिक्रमणे स्वतःहून दूर करावीत.”असेही त्यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
महसूल सप्ताहात मोहीम स्वरूपात उपक्रम राबविण्यात येणार असून महसूल सेवा नागरिकांना विनासायास उपलब्ध करून दिल्या जातील. अनेक सेवा आता एका क्लिकवर ऑनलाईन मिळत असून त्यात आणखी सेवांचा समावेश करण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची घरी जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया राबवली जात आहे. सर्व नागरिकांनी शासन उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, जीवंत सातबारा मोहीम, शर्तभंग जमीन नियमाकुल करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद, एग्रीस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र व भोगवटा २ चे भोगवटा १ मध्ये रूपांतर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच, अस्तगाव, चोळकेवाडी, पडसवाळ या तीन किलोमीटर शिव रस्त्याच्या मोजणी नकाशाचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी या नव्याने घोषित महसूली गावाच्या अधिसूचनेचे वाटपही यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहातील उपक्रमांची व नागरिकांना पुरविण्यात आलेल्या महसूल सेवांची माहिती दिली.