Ramadan : कर्जत : जनसेवा हीच ईश्वर-अल्लाहची सेवा, प्रत्येक धर्मात माणुसकी हीच शिकवण दिली आहे. प्रत्येकाचा आदर ठेवत आपले जीवन जगण्याचा रस्ता दाखवला आहे. रमजानचा रोजा, एकादशीचा उपवास भक्तीचा मार्ग आहे. मात्र देश धर्मापेक्षा (Religion) कायम मोठा आहे. धर्मग्रंथ वेगवेगळ्या भाषेत असले तरी त्यातील शिकवण एकच आहे ती म्हणजे एकमेकांना प्रेम, स्नेह देत प्रत्येक धर्माचा आदर करणे होय असे प्रतिपादन मौलाना आखलाक अहमद यांनी केले. ते रविशंकर विद्यामंदिरात (Ravi Shankar Vidya Mandir) सर्वधर्म समभाव रमजान (Ramadan) रोजा इफ्तार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी हभप दयानंद महाराज कोरेगावकर, प्रवीण महाराज मुळे, संदीप महाराज तनपुरे, विद्या मंदिराचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी धोंडिबा मुळे, डॉ यशवंत लांगोरे, मुख्याध्यापिका सविता बळे, इल्लूभाई पठाण, तात्या क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यामंदिराच्यावतीने रोजा ठेवलेल्या विद्यार्थी रोजदारांसाठी खजूर आणि फळे वाटप करण्यात आले.
नक्की वाचा : बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ; श्रीगोंदा यात्रेत खाद्य पदार्थांची रेलचेल

दयानंद महाराज कोरेगावकर म्हणाले की
यावेळी बोलताना हभप दयानंद महाराज कोरेगावकर म्हणाले की, सर्वधर्म समभाव हाच संदेश प्रत्येक धर्माने दिला आहे. आज रमजानचा रोजा आणि एकादशीचा दुग्धशर्करा योग आला आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी ठेवलेला रोजा निश्चित अखंड भारताचे उत्तम उदाहरण आहे. प्रेमाने जग जिंकता येते. एकमेकांचा आदर करा. हाच संदेश गीता, कुराण आणि बायबलमध्ये दिला आहे. अंतर्मनातील विष बाजूला केले तर निर्मात्याने जग खूप सुंदर बनवले आहे. त्याने कोणाशीच भेदभाव केला नाही. आणि हेच कटू सत्य आहे. संत कबीर यांचे दोहे, श्लोक आणि संस्कृत भाषेत उदाहरणे देत दयानंद महाराजांनी मुलांशी संवाद साधला.
अवश्य वाचा : नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला

सर्वच धर्मात माणुसकी हाच संदेश (Ramadan)
नंदकुमार लांगोरे प्रास्ताविक करताना म्हणाले की, विद्यामंदिराच्या विविध उपक्रमात सर्वधर्मीय विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवून विविधेत एकता जपत असतात. त्याच पार्श्वभूमीवर आज विद्यार्थ्यांनी आपल्या मुस्लिम संवगड्यासाठी रमजानचा रोजा ठेवत “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा” हा संदेश दिला. सर्वच धर्मात माणुसकी हाच संदेश देण्यात आला आहे. भाईचारा जपण्यासाठी आपण कायम पुढे यायला हवे. ज्यांनी रोजा ठेवला त्यांचे अभिनंदन म्हणत पालकांचे विशेष कौतुक केले.



