Ramdas Navami : कर्जत: तळपणाऱ्या उन्हात दासनवमीनिमित्त उपस्थित भाविकांच्या अलोट गर्दीत प्रभू रामचंद्र (Prabhu Ramchandra) आणि समर्थ रामदास स्वामींच्या (Samarth Ramdas Swami) जयघोषात खातगावच्या समर्थ मठातील दासनवमी (Ramdas Navami) महोत्सव तपपूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. तेथील आनंदी नारायण कृपा न्यास संचलित श्री समर्थ रामदास स्वामी मठात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दासनवमी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा झाला. यावर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मठ स्थापनेच्या तपपूर्ती निमित्ताने करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नक्की वाचा : अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार – राधाकृष्ण विखे पाटील
राम मंदिर उभारणीच्या कार्यास आशीर्वाद
शंकराचार्य यांच्या पूजन व दर्शन सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते मठात असलेल्या गोशाळेतील शेण व गोमूत्रापासून उत्पादित वस्तूंचे उदघाटन करण्यात आले. तसेच, समर्थ मठातील मारुतीच्या मूर्तीसमोर राम मंदिर उभारणीच्या कार्यास आशीर्वाद मिळाला.
अवश्य वाचा : तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले;दोघांचा मृत्यू
यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले की, (Ramdas Navami)
प्रत्येकाने सकारात्मक विचार बाळगल्यास नक्कीच यश प्राप्त होते. धर्म टिकून राहिल्यासच आपले तारण करेल.” त्यांनी समर्थ पादुकांच्या ऐतिहासिक व शास्त्रीय परीक्षणाच्या उपक्रमाचेही कौतुक केले.
समर्थभक्त मोहनबुवा रामदासी म्हणाले की, शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्त निवास, गोशाळेची पुनर्बांधणी, रस्ते निर्माण यांसह विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत. दासनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने या उत्सवात सहभाग नोंदविला.कोर हेरिटेज, पुणे संस्थेद्वारे समर्थ पादुका व श्रीराम पंचायतन मूर्तीचे ऐतिहासिक शास्त्रीय परीक्षण करण्यात आले. या पादुका शिवकालीन असल्याचे प्रमाणपत्र करवीरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते मठाचे कार्यकारी विश्वस्त समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांना प्रदान करण्यात आले. उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचन व गायनसेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनईवादक प्रमोद गायकवाड यांच्या सुमधुर सनईवादनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. २२ फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी समर्थांच्या निर्याण कथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. २३ फेब्रुवारी रोजी श्रीरामबुवा रामदासी यांनी लळीत कीर्तन सादर केले. महोत्सवाच्या सांगतेला सर्व सेवेकऱ्यांना श्रीफळाचा प्रसाद वाटप करण्यात आला आणि भक्तिमय वातावरणात दासनवमी महोत्सवाची समाप्ती झाली.