नगर : पक्षात येणाऱ्यांची उपयुक्तता, त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम, स्वच्छ कारभार पाहून नेत्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे असे जे नेते पक्षात येण्यास इच्छुक आहेत, त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
नक्की वाचा : ‘ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही’-अजित पवार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अनेक नेते पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे येत आहेत. कागलचे भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलत असताना शरद पवारांनी हे सूचक विधान केले आहे.
‘नवीन पिढीसमोर खोटा इतिहास कुणी मांडू नये’ (Sharad Pawar)
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती,असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, नवीन पिढीसमोर खोटा इतिहास कुणी मांडू नये. चुकीचा इतिहास मांडल्यानंतर समाजात गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे इतिहासकारांनी जे मत मांडले, त्याचा आदर करणे गरजेचे आहे.
अवश्य वाचा : झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!
‘बदलापूरच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक’ (Sharad Pawar)

पवार पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात रोज कुठेतरी महिलांवर अत्याचार झाल्याची बातमी कानावर येते. राज्य शासन विशेषतः गृहखात्याने यावर सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण करायला हवा. पण हे गृहखात्याकडून केले जात नाही”, अशी टीका शरद पवार यांनी केली. बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाला, ही संतापजनक घटना होती.याची प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये उठणे स्वाभाविक होते. पण सरकारने सांगितले की, ही बाहेरून आलेली लोक होते. बाहेरून कशाला कोण लोकं आणेल? ज्या लोकांनी आंदोलन केले, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. लोकशाहीच्या चौकटीत बसून कुणी आंदोलन करत असेल तर ही चुकीची बाब नाही. पण त्यासाठी अस्वस्थ असलेल्या लोकांवर खटले दाखल करता, ही बाब निंदनीय असल्याचे शरद पवार म्हणाले.



