Shrigonda | श्रीगोंदा : ढोल-ताशांचा गजर आहे, गुलालाची उधळण आणि आकाशाला गवसणी घालणारे पाळणे फिरत आहेत. पण याच गर्दीच्या एका कोपऱ्यात, जिथे रंगांऐवजी लोखंडाचा काळा कुट्ट रंग आणि मिठाईच्या वासाऐवजी धूळ अंगावर उडतेय, तिथे एक ‘वेगळीच जत्रा’ भरली आहे. ही जत्रा आहे—हरवलेल्या निरागसतेची आणि अकाली आलेल्या प्रौढत्वाची! आपण ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि ‘डिजिटल इंडिया’च्या बाता मारतो. पण श्रीगोंद्याच्या (Shrigonda) रस्त्यावर ताडपत्री टाकून बसलेल्या या कुटुंबाकडे पाहिलं की, ‘समृद्ध भारत’ नेमका कुठे आहे, असा प्रश्न पडतो.
अवश्य वाचा- कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी
यात्रा म्हणजे करमणूक नसून ‘जगण्याची लढाई’ (Shrigonda)
ज्या वयात चिमुकल्या हातांनी आईकडे ‘हट्ट’ करायला हवा, त्याच वयात श्रीगोंद्याच्या यात्रेत ही मुले धारदार विळे आणि जड कढया सावरताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी यात्रा म्हणजे करमणूक नसून ‘जगण्याची लढाई’ आहे. छायाचित्रात दिसणारी ती चिमुकली, स्वतःच्या भावाला सावरताना त्याच्या भविष्याचं ओझंही खांद्यावर घेतल्यासारखी वाटते. तिच्या डोळ्यांत जत्रेचं कुतूहल नाही, तर गिऱ्हाईक न आल्यास आजची चूल पेटणार की नाही, याची भीषण धास्ती आहे.
हे वाचा – श्रीगोंद्यात भक्तीचा महाकुंभ!; ‘शेख महंमद महाराज’ यात्रेत लाखांचा जनसागर
लहान मुलांचे कष्ट (Shrigonda)
“जत्रेचा पाळणा आभाळाला स्पर्श करतोय खरा, पण या कष्टकरी मुलांच्या स्वप्नांचा पाळणा मात्र गरिबीच्या खिळ्यांनी जमिनीलाच ठोकून धरला आहे.” यात्रेच्या रोषणाईत आपण हजारो रुपये आनंदासाठी उडवतो. पण याच मुलांकडून विळा किंवा कढई घेताना आपण पाच-दहा रुपयांसाठी तावातावाने घासाघीस करतो. आपल्या त्या ‘घासाघिशीतून’ आपण कोणाच्या तरी तोंडचा घास हिरावून घेत आहोत, याचं भानही आपल्याला उरत नाही.
चिमुकल्यांच्या हातातील ते लोखंडी ओझं उतरणार का? (Shrigonda)
हे वाचा – वेळेआधी विमानाने केले उड्डाण; खासदार निलेश लंकेंचा पारा चढला
श्रीगोंद्याची यात्रा संपेल, पाळणे निघून जातील, गर्दी ओसरेल. पण या चिमुकल्यांच्या हातातील ते लोखंडी ओझं उतरणार का? या मुलांना शाळेची पाटी आणि पेन्सिल मिळणार की विळ्याची धार काढण्यातच त्यांचं आयुष्य खर्ची पडणार? या कष्टकरी हातांना केवळ ‘सहानुभूती’ नकोय, तर त्यांच्या कष्टाचा सन्मान आणि मुलांसाठी सन्मानाचं जगणं हवंय. पुढच्या वेळी जत्रेत फिराल, तेव्हा डोळ्यांत गुलालाची चमक असू द्या, पण काळजात या मुलांच्या डोळ्यांतील ती शांत अगतिकताही आठवा.



