Somnath Gharge : नगर : अहिल्यानगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा जिल्हा आहे. मुंबईपेक्षा या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. ही आज नाही तर अनेक अनेक वर्षांपासून आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या (Criminal Gangs) हद्दपार करण्यात आल्या आहेत. पण दुसरीकडे आता नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध गावठी कट्टे (Gavathi Katte) हे उपलब्ध होत आहेत. गावठी कट्टे जिल्हाबाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा टोळीवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी सांगितले.
अवश्य वाचा : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते
कोणाची गय केली जाणार नाही
तसेच गोवंश बंदी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कुलबर्गे, शहर उपविभागीग अधिकारी अमोल भरती, स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक : मुख्यमंत्री
पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, (Somnath Gharge)
जिल्ह्यामध्ये गो हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये पोलीस कठोर भूमिका वेळप्रसंगी घेतील. तसेच शहरात सोन साखळीच्या घटना रोखल्या गेल्या पाहिजे. याकरता सुद्धा आता उपाययोजना करणार आहोत. त्याकरता स्थानिक पोलिसांना तसेच सूचना देऊन प्रत्येक चौका-चौकामध्ये कशा पद्धतीने लक्ष ठेवता येईल, या दृष्टिकोनातून आता पोलीस आगामी काळामध्ये काम करतील,असे ते म्हणाले.श्रीरामपूर, नगर, संगमनेर असो किंवा अन्य ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल, यासाठी जिल्ह्यात पोलीस प्रशासन काम करणार आहे. नगर शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेला अधिक कर्मचारी देण्यात आले आहे. त्यामुळे नगर शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच नगर शहरात आरटीओ च्या मदतीने शहरातील रिक्षा तसेच इतर वाहनांची माहिती घेऊन संयुक्त कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात बँका, पतसंस्थाकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या घटनेचा छडा लवकर लागण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला नव्याने अधिक कुशल बळ उपलब्ध करून दिले आहे. या उद्देशाने आम्ही संबधित विभागाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
“बांगलादेशींच्या संदर्भात माहिती घेणार”
नगर शहरासह जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरी झाली असेल तर त्या संदर्भामध्ये स्थानिक पोलीस माहिती घेतील. पोलीस प्रशासनाकडे या अगोदरची माहिती उपलब्ध आहे. पण नवीन काही माहिती असेल तर ती सुद्धा घेतली जाईल व त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
गोळीबार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीचा जामीन रद्द करणार
भीमराज आव्हाड हा पांगरमल हत्याकांडातील आरोपी आहे. तो सध्या जामिनावर असून तो सराईत गुन्हेगार आहे. तपोवन रोड परिसरात ढवण वस्तीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तो आरोपी आहे. या आरोपीचा जामीन रद्द करणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.