Sugar Production | साखर निर्मितीत महाराष्ट्र देशात एक नंबर; उत्तर प्रदेशाला टाकले मागे

0

Sugar Production | नगर : साखर कारखान्यांतील उसाच्या चालू (२०२५-२६) गाळप हंगामात महाराष्ट्राने (Maharashtra) साखर उत्पादनात (Sugar Production) उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) मोठ्या फरकाने मागे टाकत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याकडे कूच केली आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) पुण्यात झालेल्या बैठकीत जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन ३२४ लाख टन राहण्याची शक्यता असून, त्यात महाराष्ट्राचा वाटा ११८ लाख टन इतका असेल. गेल्या हंगामात महाराष्ट्राचे उत्पादन ९३.५१ लाख टन होते, म्हणजेच यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे. याउलट, उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन ९८.५ लाख टन राहण्याचा अंदाज असून गेल्या वर्षीच्या १०१.१६ लाख टनांच्या तुलनेत त्यात घट झाली आहे.

हे वाचा – अमेरिका व इस्त्रायलचा महिन्यापूर्वी शिजला प्लॅन; एका तासात इराणचे सर्वोच्च नेते ठार

१११.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production)

अहिल्यानगर विभागात कारखान्यांनी आतापर्यंत १२३.५९ लाख टन गाळप करून १११.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा ९.०२ टक्के आहे. विभागातील २८ साखर कारखान्यांपैकी १५ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे.

इस्माच्या कार्यकारी समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीनंतर देशातील साखर उत्पादनाचा चालू हंगामातील तिसरा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे मूल्यमापन करून हा अंदाज मांडण्यात आला आहे. त्यात आतापर्यंत तोडणी झालेल्या उसाचे क्षेत्र, तोडणी राहिलेले क्षेत्र यांचा विचार करण्यात आला आहे. तसेच, उसाचे उत्पादन, साखरेचा उतारा या गोष्टींचाही विचार यात करण्यात आला आहे.

अवश्य वाचा-  कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी

साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल (Sugar Production)

इस्माच्या अंदाजानुसार, देशात या हंगामात साखर उत्पादन ३२४ लाख टन राहील. त्यातील ३१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल. यामुळे निव्वळ साखर उत्पादन २९३ लाख टन असेल. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन १२ टक्के जास्त असेल. आधीच्या अंदाजात देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर राहील, असे चित्र मांडण्यात आले होते. नवीन अंदाजात उत्तर प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्र प्रथम स्थानी पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादन ११८ लाख टन असेल. गेल्या हंगामात ते ९३.५१ लाख टन होते. उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन ९८.५ लाख टन अपेक्षित असून, ते गेल्या हंगामात १०१.१६ लाख टन होते. कर्नाटकचे साखर उत्पादन ६१.०४ लाख टन राहण्याचा अंदाज असून, ते गेल्या हंगामात ५४.८८ लाख टन होते.

नक्की वाचा- कृषी विद्यापीठांची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली घसरण दुर्दैवी : सत्यजित तांबे

उसाचे गाळप पूर्ण (Sugar Production)

राज्यात आतापर्यंत १००२.२४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम आता प्रगत टप्प्यावर पोहोचला असून, २५ फेब्रुवारी २०२६ अखेरच्या साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार राज्यातील साखर उत्पादनाने मोठी झेप घेतली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकूण २१० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले. ज्यामध्ये १०३ सहकारी आणि १०७ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. ताज्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत एकूण १००२.२४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले असून, त्यातून ९४३.०४ लाख किंटल साखर उत्पादित झाली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा सध्या ९.४१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

विभागीय कामगिरीचा आढावा घेतल्यास, कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्याच्या बाबतीत राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. कोल्हापूर विभागातील ३९ कारखान्यांनी २३३.८५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून सर्वाधिक १०.९७ टक्के साखर उतारा मिळवला आहे. या विभागात आतापर्यंत २६ साखर कारखान्यांनी त्यांचे गाळप हंगाम पूर्ण करून कामकाज बंद केले आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ४९ साखर कारखाने सुरू झाले होते, जिथे २२२.२० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून येथील साखर उतारा ८.५५ टक्के आहे. पुणे विभागात ३२ कारखान्यांच्या माध्यमातून २१६.०३ लाख मेट्रिक टन ऊसावर प्रक्रिया करण्यात आली असून येथील साखर उतारा ९.७५ टक्के नोंदवला गेला आहे.

राज्यातील अनेक कारखाने बंद होण्यास सुरुवात (Sugar Production)

हंगामाच्या उत्तरार्धात आता राज्यातील अनेक कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण २१० कारखान्यांपैकी ७८ कारखान्यांनी आपला चालू हंगामातील गाळप प्रवास थांबवला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील १६ आणि सोलापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५०७.४८ लाख टन ऊस गाळप केले आहे, तर खाजगी साखर कारखान्यांनी ४९४.७६ लाख टन ऊसाचे गाळप करून मोलाचा वाटा उचलला आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित कारखानेही आपला हंगाम पूर्ण करण्याची शक्यता साखर आयुक्तालयाकडून वर्तवण्यात येत आहे.

हे पहा – दुबईतील बुर्ज खलिफाजवळ इराणी ड्रोन

जिल्हानिहाय गाळप, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्याची सविस्तर आकडेवारी (Sugar Production)

(लाख मेट्रिक टन/लाख क्विंटल /टक्केवारी) 

अहिल्यानगर – गाळप १२३.५९, साखर १११.४२, उतारा ८.८६ 

कोल्हापूर – गाळप १२७.४८, साखर १४३.२८, उतारा ११.२४ 

सांगली – गाळप ७९.२५, साखर ८३.४३, उतारा १०.५३ 

सातारा – गाळप १०३.०५, साखर १०१.०३, उतारा ९.८ 

पुणे – गाळप ११२.९७, साखर १०९.५१, उतारा ९.६९ 

सोलापूर – गाळप १५७.०३, साखर १३८.६७, उतारा ८.८३ 

धाराशिव – गाळप ५७.२३, साखर ४४.५९, उतारा ७.७९ 

नाशिक – गाळप ९.३८, साखर १०.१०, उतारा १०.७७ 

नंदुरबार – गाळप ९.०७, साखर ६.६०, उतारा ७.२८ 

जळगाव – गाळप १.५९, साखर १.४८, उतारा ९.२९ 

छत्रपती संभाजी नगर – गाळप २८.०५, साखर २८.३७, उतारा १०.११ 

जालना – गाळप २७.९३, साखर २०.९९, उतारा ७.५१ 

बीड – गाळप ४४.५३, साखर ३३.०९, उतारा ७.४३ 

परभणी – गाळप ३१.५२, साखर २८.४९, उतारा ९.०४ 

हिंगोली – गाळप १६.१०, साखर १५.३४, उतारा ९.५३ 

नांदेड – गाळप २०.६३, साखर १९.७७, उतारा ९.५८ 

लातूर – गाळप ४८.६३, साखर ४५.४१, उतारा ९.३४ 

बुलढाणा – गाळप १.८४, साखर १.८७, उतारा १०.१७ 

यवतमाळ – गाळप ९.६७, साखर ८.७९, उतारा ९.०९ 

नागपूर – गाळप ०.९३, साखर ०.००, उतारा ०.०० 

भंडारा – गाळप ०.९०, साखर ०.७९, उतारा ८.८२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here