Sujay Vikhe Patil: राहुरीची पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला न्याय देण्याची: विखे पाटील  

राजकारणात सर्वसमावेशकता महत्त्वाची

0

Sujay Vikhe Patil: राहुरी: नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला न्याय देण्याची आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला बळकटी देण्याची संधी असल्याचे भावनिक प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले. उंबरे व ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना साथ देण्याचे आवाहन केले. राहुरी तालुक्यातील उंबरे व ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांच्या या बैठकीत विविध स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा- देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

राजकारणात सर्वसमावेशकता महत्त्वाची (Sujay Vikhe Patil)

सभेच्या सुरुवातीला डॉ. विखे पाटील यांनी सर्वांचे आभार मानत विशेषतः तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक केले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय हा माणुसकी, संस्कार आणि राजकीय परिपक्वतेचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. एवढा मोठा त्याग करणे सोपे नसते, असेही ते म्हणाले. राजकारणात सर्वसमावेशकता अत्यंत महत्त्वाची असून, कोणत्याही गटाची अवहेलना न करता एकजुटीने काम करणे हीच खरी ताकद असल्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असल्याचे सांगत, मतदारसंघाच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उबाठा गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. बैठकीत संघटन बळकट करण्यावर विशेष भर देत विकासाच्या मुद्द्यांवर जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.