Uttar Movie:आई-मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

0
Uttar Movie:आई-मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या 'उत्तर'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Uttar Movie:आई-मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या 'उत्तर'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

नगर : प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी. जन्मानंतर रूढार्थानं त्याची आणि आईची नाळ कापली जाते,पण तरीही नाळ आयुष्यभर जोडलेलीच राहते. अशीच आई- मुलाच्या (Mother-Son) नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणाऱ्या उत्तर (Uttar Movie) या चित्रपटाचा टीझर (Teaser Release)प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

नक्की वाचा:  ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष

 १२ डिसेंबरला चित्रपट रूपेरी पडद्यावर (Uttar Movie)

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘उत्तर ‘ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात गुणी आणि चोखंदळ अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहे तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय, याचं ‘उत्तर’ रसिकांना येत्या १२ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अवश्य वाचा:  भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!  

टीझरमध्ये नेमकं काय ?  (Uttar Movie)

तंत्रज्ञानाच्या या युगात संवादाची साधने जरी वाढली असली तरी माणसांचा आपआपसांतील संवाद कमी होत चालल्याची चिंता आपण अनेकदा व्यक्त करतो. ‘उत्तर’च्या टिझरमध्येही अशाच प्रकारचा आई मुलामधला संवाद बघायला मिळतोय. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलासोबत आईचा फोनवरील खुमासदार संवाद यात ऐकायला मिळतो. ज्यात आईच्या  काळजीच्या प्रश्नांना कंटाळलेला मुलगा फोन ठेवू का ? असं विचारतो त्यावर “इनकमिंगला पैसे पडल्यासारखा बोलतोस” अशी आईची प्रतिक्रिया पण दिसते. थोडक्यात, फास्ट फुड, फास्ट वाय फाय, सगळं काही इन्स्टंट, रेडिमेड हवं, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला थोडा ठहराव देणाऱ्या आईची ही गोष्ट असावी,असा अंदाज टिझरवरून येत आहे.  

झी स्टुडिओजसोबत आजवर ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुरळा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही ‘सिंघम २’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि ‘ताली’सारख्या संवदेनशील वेबसिरीजचं लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. उत्तर बद्दल बोलताना तो म्हणाला की, ” ‘आई’ हे सगळ्यात गृहीत धरलेलं, त्यामुळेच जवळचं असूनही दुर्लक्ष होणारं नातं आहे. तिचा फक्त ‘व्यक्ती’ म्हणून विचार करणारी आणि ‘आई आणि मूल’ या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती करायची, यातून ‘उत्तर’ हा सिनेमा जन्माला आला.”