
Zilha Parishad : नगर : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. मुंबईतील (Mumbai) वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या डोममध्ये आयोजित सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आनंद भंडारी यांनी हा सन्मान स्वीकारला.
हेही वाचा : डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
राज्यात नावलौकिक निर्माण करण्याचा मानस
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले व जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियान ५.० मध्येही अहिल्यानगर जिल्हा परिषदेने नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आता चालू असलेल्या माझी वसुंधरा अभियान ६.० मध्ये जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले जात असून अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक निर्माण करण्याचा मानस नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी व्यक्त केला.
हे पहा : कंटेनरच्या धडकेत कुस्तीपटूचा मृत्यू; नगर-मनमाड महामार्गावरील घटना
यांची उपस्थिती (Zilha Parishad)
याप्रसंगी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नैसर्गिक शेती कशा प्रकारे करावी व ती जीवनशैलीसाठी किती महत्त्वाची आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी दैनंदिन जीवनात बदल करून शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेणाऱ्या माझी वसुंधरा अभियानाचे कॉफी टेबल बुक व द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन या दोन्ही पुस्तकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


