Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पाच दिवस ‘यलो अलर्ट’

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'

0
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'

Ahilyanagar : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्‍ह्यात १४ जूनपर्यंत विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा (Stormy Wind) व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) होण्‍याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात पाच दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्‍यात आला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे अथवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४  अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अवश्य वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

विजांच्या कडकडाटासह पाऊस (Ahilyanagar)

भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १० ते १२ जून या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता तसेच १३ व १४ जून या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” प्रसारीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

प्रशासनाने कळविले आहे की, मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना अथवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.

विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे-नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. जुनाट अथवा मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. वादळी वारा व पाऊस यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.