Dindi : पाथर्डी : ”पाऊले चालती पंढरीची वाट” ही आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) काढण्यात येणारी विशेष व्यसनमुक्ती आणि पर्यावरणपूरक दिंडीचे (Dindi) पाथर्डीत जोरदार स्वागत करण्यात आले. २१ जून ला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एन-६ सिडकोमधील हनुमान मंदिरातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘व्यसनमुक्त जीवन, निरोगी जीवन’ हा संदेश घेऊन पंढरपूरकडे (Pandharpur) ही दिंडी मार्गस्थ झाली आहे.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम
या दिंडीमध्ये सरपंच अशोक भिंगारे पाटील, जगदीश पाटील खैरनार, तुकाराम पाटील चव्हाण, गोविंद ढव्हाण, संतोष भोजने, भागवत सुरवाडे, भगवानदास पवार, विठ्ठल वैरागड, वेदांत कोतकर, प्रणव चिखले पाटील आदींसह मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, या दिंडीचे आयोजन छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील कर्मचारी आणि पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब राठोड हे गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत. दिंडीचा पहिला मुक्काम बिडकीन येथे, दुसरा पैठण, तिसरा शेवगाव आणि चौथा मुक्काम मढी मार्गे मायंबा येथे झाला. दरम्यानच्या प्रवासात दिंडीतील कार्यकर्त्यांनी मार्गावर भेटणाऱ्या अनेक व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश देऊन, त्यांना चॉकलेटचे वाटप करत प्रेरित केले. दिंडीतील मुख्य आकर्षण म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम. “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेतून अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत. पाथर्डी शहरात दिंडी पोहोचताच बर्ड संस्थेचे समन्वयक डॉ. दीपक देशमुख, शिरीष जोशी, नवनाथ चव्हाण, संजय सुडके आणि भाऊसाहेब शिरसाट यांनी दिंडीचे स्वागत केले.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
स्वागतपर भाषणात डॉ. देशमुख म्हणाले, (Dindi)
“पोलीस दलात कार्यरत असूनही समाजजागृतीसाठी अशा उपक्रमात योगदान देणारे बाळासाहेब राठोड हे समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. अशा चळवळीमुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी घडेल.” बाळासाहेब राठोड हे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आपली सेवा बजावताना व्यसनमुक्तीचा ध्यास घेतला आहे. राठोड म्हणाले की, गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम सुरू ठेवले असून अनेक पोलीस कर्मचारी, तरुण तसेच आरोपी देखील व्यसनमुक्त झाले आहेत. प्रत्येक मुक्कामी ३० ते ३५ किमी अंतर चालून, संवाद, प्रबोधन व मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. या उपक्रमामुळे पंढरपूर वारी ही फक्त धार्मिक यात्राच न राहता, समाजपरिवर्तनाची प्रभावी चळवळ बनत आहे.