Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam Attack) येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान (Pakistan) विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काळ बुधवारी सायंकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या घेरण्यासाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत. हे पाच मोठे निर्णय कोणते ते पाहुयात…
नक्की वाचा : त्याने धर्म सांगताच मारली गोळी!;पहलगाम हल्ल्याची आपबिती…
१. सिंधु पाणी करार स्थगित : (Pahalgam Terror Attack)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये झालेला सिंधू जल करार निलंबित करण्यात आला आहे. हा निर्णय एक महत्त्वाचा धोरणात्मक पाऊल मानलं जातंय. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहील. त्यानंतरच यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
२. अटारी सीमा बंद
भारताने अटारी येथील सीमा तात्काळ बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांमधील व्यापार आणि लोकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मार्ग होती. ही सीमा बंद झाल्याने द्विपक्षीय व्यापारावरही थेट परिणाम होईल. व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबेल. जे लोक वैध मार्गाने सीमा ओलांडून आले आहेत, त्यांना १ मे २०२५ पर्यंत त्या मार्गाने परत जाण्याची मुभा देण्यात आलीय.
३. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द:
सार्क व्हिसा एक्झेम्प्शन स्कीमद्वारे पाकिस्तानी नागरिकांना यापुढे भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी केलेला कोणताही सार्क व्हिसा रद्द मानला जाईल. या व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. यामुळे आता भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानींना अडचणी येतील. त्यांना आता व्हिसा मिळू शकणार नाही.
४. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद
भारतातील पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली जाईल. यामुळे पाकिस्तानवर राजनैतिक दबाव वाढेल. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना मदत करत आहे. याशिवाय, तो वेगवेगळ्या मार्गांनी भारतविरोधी लोकांना निधी देत आहे. आता या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे, त्याचे गैरकृत्य कमी होईल. शिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही अपमान सहन करावा लागेल.
५. पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश (Pahalgam Terror Attack)
भारताने पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. दोन्ही उच्चायुक्तालयांमधून सेवा सल्लागारांच्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही परत बोलावले जाईल. नवी दिल्ली, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अशा सल्लागारांनाही परत बोलवलं जाईल. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान सहन करावा लागेल.त्यामुळे अनेक देश पाकिस्तानपासून अंतर राखतील.दहशतवादी असल्याच्या संशयावरून तेथील नागरिकांना इतर देशांमध्ये व्हिसा मिळवण्यात अडचणी येतील. तसेच पाकिस्तानातील परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होईल. अशा पद्धतीने भारत सरकारने घेतलेल्या या ५ निर्णयांमुळे पाकिस्तानची कोंडी होऊ शकते.
अवश्य वाचा : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला