Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज व वारीची परंपरा

Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज व वारीची परंपरा

0
Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज व वारीची परंपरा
Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज व वारीची परंपरा

Saint Sheikh Muhammad Maharaj : नगर : महाराष्ट्रातील (Maharashtra) संतपरंपरा ही निखळ भक्तीची, समाजप्रबोधनाची आणि मानवतेच्या शिकवणीची पवित्र वाट आहे. या परंपरेत अनेक थोर संतांनी आपले जीवन अर्पण करून जगाला दिव्य प्रकाश दिला. या संतांमध्ये एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे संत शेख महंमद महाराज (Saint Sheikh Muhammad Maharaj). ते फक्त संत नव्हते तर एक आदर्श विचारवंत, कवी, कीर्तनकार आणि जातीभेदाच्या अंधकाराला छेद देणारे एक तेजस्वी सूर्य होते. त्यांचे जीवनकार्य आणि विचार वारीच्या परंपरेत खोलवर गुंफलेले आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

संपूर्ण जीवनातून एकता, आणि निर्भेळ भक्तीचे दर्शन

संत शेख महंमद महाराज यांचा जन्म इ.स. १५७४ मध्ये वाहिरा (ता. आष्टी, जि. बीड) या गावात एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे राज महंमद तर आईचे नाव फुलाबाई असे होते. संत शेख महंमदांच्या लेखनात, वाणीमध्ये व आचरणातही वारकरी संप्रदायाची भक्तिरसाची झलक दिसून येते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून एकता, समता आणि निर्भेळ भक्ती यांचे मूर्तिमंत दर्शन घडवले.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत (Saint Sheikh Muhammad Maharaj)

शेख महंमद महाराज हे संत एकनाथ, संत जयराम स्वामी वडगावकर, संत तुकाराम महाराज यांचे समकालीन संत होते. त्यांनी ‘योगसंग्राम‘, ‘निष्कलंक प्रबोध‘, ‘पवन विजय‘, ‘अभंग‘, ‘साठी सवंत्सरी‘ असे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या लेखनशैलीत वारकरी परंपरेचा गंध असून ज्ञानेश्वरीसारखा गूढार्थ स्पष्ट करणारा भाव दिसतो.

वारी म्हणजे वारकर्‍यांची भगवंताशी नित्य नाती सांगणारी, श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली एक अनोखी परंपरा आहे. संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यात चांद बोधले शेख महंमद तुकाराम…, टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विणा शेख महंमदाची दिंडी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा… यासह अभंग, भजन, किर्तन, गौळणी, भारुड सादर केले जातात. श्वेत व भगवा ध्वज घेवून हजारो वारकरी पंढरीच्या वाटेत दिसतात ते संत शेख महंमद महाराजांचे अनुयायी असतात.

वारी म्हणजे भक्ती, शिस्त, प्रेम, सहिष्णुता आणि समाजसुधारणेचा जागर होय. संत शेख महंमद महाराजांनी वारीचा आत्मा आपल्या विचारांत, अभंगांत आणि कार्यात जपला. जरी ते मुस्लिम धर्मात जन्मले, तरी त्यांनी हरिपाठ, नामस्मरण, भजन-कीर्तन यांमध्येच आत्मशांती मानली. त्यांच्या लेखनात राम, कृष्ण, विठोबा, पांडुरंग असे शब्द इतक्या भक्तिभावाने येतात की त्यांचं भगवंताशी असलेलं नातं हे वर्णाश्रमी भेदांच्या पलिकडचं आहे. वारीच्या परंपरेतील मूल्यमान्य गोष्टी सामूहिक प्रवास, नामस्मरण, एकोप्याची भावना, हरिकथा, संतविचार, या सार्‍या गोष्टी संत शेख महंमद यांच्या जीवनात ठायी ठायी उतरलेल्या होत्या. त्यांनी केवळ स्वतः पुरता विचार अंगिकारला नाही तर समाजातील सर्व घटकांपर्यंत तो विचार रुजावा म्हणून प्रयत्नशील राहिले. मानवतावादी विचार त्यांनी आपल्या अभंगांतून मांडले. त्यामुळे त्यांची वारीच्या विचारधारेशी आत्मिक नाळ जुळलेली आपल्याला दिसून येते.

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई आणि याच रांगेत संत शेख महंमद यांचे स्थान अढळ आहे. वारीत संतांचे अभंग, त्यांच्या गोष्टी, त्यांची चरित्रं वारकर्‍यांच्या मुखावरून, भजनात, कीर्तनात, टाळमृदंगात आजही घुमत असतात. यामुळे वारीचे पवित्र वातावरण सर्वांना आत्मिक उन्नतीचा अनुभव देते.

त्याकाळात हिंदू-मुस्लिम भेद, जातीव्यवस्थेचा विळखा, आणि कर्मकांडांमुळे समाज ढासळत होता. अशा वेळेस संत शेख महंमद यांनी एका मुस्लिम व्यक्तीने ‘विठोबा‘ ची उपासना करणं, ‘अभंगरचना‘ करणं हे एका प्रकारचं सामाजिक बंडच होतं. त्यांच्या शुद्ध भक्तीला पाहून अनेक हिंदू धर्मगुरूंनीही त्यांना विरोध केला. काही ठिकाणी त्यांच्या ग्रंथांची अवहेलना करण्यात आली. तसा उल्लेख त्यांनी आपल्या साहित्यात केला आहे. मात्र तरीही त्यांनी कुठेही कटुता न ठेवता, आपल्या अभंगातून सर्वांमध्ये प्रेम, क्षमा आणि शांती पेरली.

संत शेख महंमद महाराजांची समाधी श्रीगोंदा येथे आहे. अनेक वारकरी, अभ्यासक, संतभक्त, त्यांचे अनुयायी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतात, कीर्तन करतात. त्यातून त्यांचा विचार पुढे नेतात. त्यांचा वारसा हा केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नाही. तर ते एक सांस्कृतिक सेतु बनले हिंदू-मुस्लिम ऐक्याचा, समाजप्रबोधनाचा, आणि मानवतेच्या तत्वज्ञानाचा.

संत शेख महंमद महाराजांनी सुरु केलेली वारीची परंपरा आजही त्यांच्या जन्मगावी त्यांचे वंशज चालवतात. ह.भ.प.जब्बर महाराज शेख हे श्रीक्षेत्र वाहिरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दिंडी घेऊन जातात. वै. संत साहेबलाल दादांचे नातु ह.भ.प. निसार महाराज शेख हे वडिलोपार्जित चालत आलेली षष्टीची पैठण वारी घेऊन जातात, ह.भ.प.अब्दुल महाराज शेख हे आळंदी या ठिकाणी दिंडी घेऊन जातात. वै. अमिन बाबांचे नातु ह.भ.प. पिरमहंमद शेख महाराज श्रीक्षेत्र वाहिरा ते श्रीक्षेत्र शिंगनापुर या ठिकाणी वडिलोपार्जित दिंडी घेऊन जातात. तीन वर्षांपासून संत शेख महंमद महाराजांनी सुरू केलेली पंढरपूर वारी मधल्या कालखंडात बंद पडली होती, ती वारी ‘संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान’च्या माध्यमातून पुन्हा पुर्ववत केली आहे. या पालखी सोहळ्यात कीर्तन अथवा प्रवचन हे संत शेख महंमद महाराज यांच्या अभंगावरच केली जातात. त्यांचे भजन आणि अभंगाचे गायन केले जाते. पालखी मार्गावरील अन्नदात्यांचा झाड व ग्रंथ देवून सन्मान करण्यात येतो. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही दिंडी मार्गक्रमण करते. मुक्कामाच्या ठिकाणचा सर्व परिसर स्वच्छ करुनच पालखी सोहळा पुढे जातो. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो वारकरी भक्तीभावाने सहभागी होतात.

अनेक गावांतून संत शेख महंमद महाराजांच्या नावे वारी जाते. पिंपळगांव दाणी या गावी संत शेख महंमद महाराजांच्या श्वेत ध्वजाचे मंदिर आहे. त्यांचा ध्वजाचा मान असल्याने त्यांनी ध्वजाचे मंदिर बांधले व हाच श्वेत ध्वज घेवून ते पैठण या ठिकाणी वारीला जातात तर संत शेख महंमद महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीगोंदा या ठिकाणी पिंपळगांव दाणी ते श्रीक्षेत्र श्रीगोंदा वारी करतात. त्याच प्रमाणे आष्टी तालुक्यातील बोरोडी, पुंंडी, खुंटेफळ, सोलापूरवाडी, पिंपळा या ठिकाणाहूनही संत शेख महंमद महाराजांच्या नावे आषाढी निमित्त पंढरपूरला स्वतंत्र दिंड्या जातात.


श्रीक्षेत्र श्रीगोंदा या ठिकाणाहून तीन वर्षांपासून भव्य पालखी सोहळा पंढरपूर आणि आळंदी या ठिकाणी जातो. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या प्रमाणेच मानाचा अश्व, मानाची बैलजोडी, नगारा आदींचा समावेश पालखी सोहळ्यात आहे. गतवर्षी संत शेख महंमद पालखी सोहळ्यात तब्बल तीन हजार वारकरी सहभागी होते. दिवसेंदिवस वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

वारी ही केवळ पायपीट नसून समाजाला जोडणारा धागा आहे. संतानी तत्कालीन सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी वारीचे माध्यम वापरले आहे. सध्याच्या घडीला आपल्या समस्यांचे स्वरूप काहीसे बदलले असले तरी त्या कायम आहेत. समाजातील विषमता, धार्मिक तेढ, महिलांवरील वाढते अत्याचार, भ्रष्टाचार अशा सामाजिक समस्या तर वाढते तापमान, बदलते ऋतू चक्र यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक पर्यावरणीय समस्या आपल्या समोर आहेत. त्यावर मात करण्यासाठी वारी च्या व्यासपीठाचा वापर सकारात्मक पद्धतीने करणे गरजेचे आहे. सामाजिक समस्यांवर खल करतानाच पर्यावरण संवर्धनाचा विचार पेरण्याची खरी गरज आहे. त्यातूनच आपला सकल समाजाचा उत्कर्ष होईल. आपली हीच कृती संताना अभिप्रेत असावी.

लेखक – सिद्धीनाथ मेटे महाराज
(अध्यक्ष, संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठान, श्री क्षेत्र वाहिरा)