Rabi Season | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील रब्बी पिके जोमात आहेत. १ हजार २२ महसुली गावांतील रब्बी पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे. रब्बी हंगामातील (Rabi Season) ज्वारीची काढणी झाली. गव्हाच्या काढणी काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी काढणीला अद्याप १५ ते २० दिवसांचा अवधी बाकी आहे. जिल्ह्यात १ हजार ६०९ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५८७गावे खरीप हंगामी आहेत. यामध्ये अकोले व संगमनेर तालुक्यांतील सर्वच गावांचा समावेश आहे. उर्वरित १ हजार २२ गावे रब्बी हंगामी आहेत.
हे वाचा – जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
शेत शिवारात पाणीच पाणी
यंदा रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख ४९ हजार ६६८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले. यंदा दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी होते. त्यामुळे रब्बी ज्वारी व इतर पिकांना पेरणीसाठी रानंच मोकळी नव्हती. त्यामुळे रब्बी ज्वारीस पेरणीस उशीर झाला. इतर गहू, हरबरा, मका आदी पिकांची पेरणी काही ठिकाणी वेळेत तर काही ठिकाणी उशीरा झाली.
अवश्य वाचा – भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले
शंभर टक्के नोंद
रब्बी पिकांसाठी पाणी भरपूर असल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी उशीरा होऊनही शंभर टक्के नोंद झाली आहे. जिल्हाभरातील धरणांत पाणीच पाणी तसेच भूजलपातळी उत्तम असल्याने विहिरी आणि बोअरला देखील मायदळ पाणी असल्याकारणाने रब्बी पिके जोमात आली. जिल्हाभरात दीड लाख हेक्टरवर गह तर सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झालेला आहे.
अवश्य वाचा – शिवाजीराव कर्डिलेंचा वारसदार राजकीय आखाड्यात
बहुतांश ठिकाणी ज्वारीची काढणी झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने रब्बी हंगामी १ हजार २२ गावांतील अंतिम पैसेवारी १५ मार्च रोजी जाहीर केली. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामी पिके उत्तम असल्याचे दिसून आले आहे.
तालुकानिहाय पैसेवारी ५० पेक्षा जास्त असलेल्या गावांची संख्या
कोपरगाव ६३
राहाता ३७
श्रीरामपूर ५४
राहुरी ७९
अहिल्यानगर ११६
नेवासा ११४
पाथर्डी ५७
शेवगाव ८०
पारनेर १००
श्रीगोंदा ११५
कर्जत ११८
जामखेड ८७



