Hemant Ogale : श्रीरामपूर : श्रीरामपूरचा जातीय सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा काहींचा प्रयत्न आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा आमदार हेमंत ओगले (Hemant Ogale) यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या राम-रहीम उत्साहामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आमदार ओगले यांच्यासह नगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात (Additional Superintendent of Police) जाऊन पोलीस प्रशासनाला जाब विचारला, यावेळी श्रीरामपुरातील नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
निवेदनात म्हटले की (Hemant Ogale)
पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर हे गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. हत्या, हाणामाऱ्या, सर्रासपणे अवैध गावठी कट्टे यांसारख्या गोष्टी घडवून जाणीवपूर्वक दहशत माजवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे तेच हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे ताजे उदाहरण देण्याचे झाल्यास सध्या चालू असलेल्या राम-रहिम उत्सव चालू आहे. त्यामध्ये सय्यद बाबा उरुस चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका इसमावर प्राणघातक हल्ला झाला. लगेच दुसऱ्या दिवशी श्रीराम नवमीच्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यात्रा बंद पाडण्याचा घाट
श्रीराम नवमीच्या यात्रेत काही स्वयंघोषित धर्मरक्षक म्हणवून घेणाऱ्यानी जातीयवाद करुन यात्रा बंद पाडण्याचा घाट घातला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदिर चौकात भर यात्रेत एका इसमावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.अशा प्रकारे ऐन सणासुदीच्या काळात गावात दहशत माजवून गावची शांतता भंग करण्यात आली आहे. आणि हा सगळा प्रकार पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत आहे. काही प्रवृत्तींना गावात जाती जाती मध्ये, धर्मामध्ये द्वेष पसरवून जातीय सलोखा बिघडवून अशांतता पसरवायची आहे. समाजकंट हा कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा नसतो अशांवर तातडीने गुन्हे दाखल करावे अन्यथा श्रीरामपूरचे नागरिक कायदेशीर रित्या प्रशासना विरोधात आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
यांच्या स्वाक्षऱ्या
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, व्यापारी असोसिएशनचे राहुल कोठारी, गटनेते मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण, सभापती राजेंद्र पवार, दिपक वमने, योगेश जाधव, रईस जहागिरदार, पंडित मामा बोंबले, गौतम उपाध्ये, अशोक उपाध्ये, अहमदभाई जहागिरदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



