Farmers’ Movement : उसाच्या दरासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकऱ्यांनी ‘पेटविले रान’

जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

0

नगर : नगर (Ahmednagar) जिल्हा हा साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून राज्यभर परिचित आहे. मात्र, जिल्ह्यात उसाला दर जाहीर झाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचे पडसाद आज शेवगाव तालुक्यात दिसून आले. शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers’ Movement) सुरू केले आहे.

नक्की पहा : राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता

शेवगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांकडून ऊस दराची घोषणा व्हावी, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक शेवगाव तहसीलदार व साखर कारखानदार यांना निवेदन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत चालू हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे आज (बुधवारी) सकाळी शेवगाव पैठण रस्त्यावरील गंगामैय्या साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली.

अवश्य वाचा :  मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गंगामाई कारखान्यासह लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांचे वाहने यावेळी अडवण्यात आली. जोपर्यंत ३१०० रुपये भाव देण्यात येणार नाही तोपर्यंत कुठलेही ऊस वाहतुकीची वाहने सोडण्यात येणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी गंगामाई कारखान्याचे प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील बैठक निष्फळ ठरल्याने पेच कायम राहिला. तालुक्यातील शेवगाव-नेवासा रस्त्यावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, दत्तात्रेय फुंदे, संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भातकुडगाव फाटा व ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यस्थळावरील वजन काट्यावर ऊस दरवाढीच्या घोषणा देऊन आंदोलन केले. या आंदोलनाला ऊस उत्पादक शेतकरी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून साखर कारखानदार प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


गंगामाई साखर कारखाना प्रशासनाशी झालेली चर्चा निष्फळ…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष अशोक भोसले, संदीप मोटकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, दादा पाचरणे, दादा टाकळकर, रामेश्वर शेळके, विकास साबळे, नाना कातकडे, रामेश्वर शेळके, शिवाजी साबळे, शेवगाव तालुका युवक चे अमोल देवढे, संकेत कचरे, नाना कातकडे, घोटण खानापूर, एरंडगाव, बाभूळगाव, करेटाकळी, गदेवाडी तसेच घोटण पंचक्रोशीतील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी गंगामाई कारखाना प्रशासनाशी चर्चा झाली यावेळी कारखाना प्रशासनाने २७०० रुपये दर जाहीर केला, तसेच इतर कारखान्यांनी दर वाढीव दिला तर आम्हीही देऊ असा पवित्र घेतल्यामुळे या चर्चेत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे आंदोलन चालूच राहील. सर्व साखर कारखाना हे पडद्यामागून एकच आहेत, असे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन कारखान्यांना ऊस देऊ नये, असे आवाहनही लवांडे यांनी केले.

गंगामाई कारखाना जो दर जाहीर करीत त्याप्रमाणे भाव देऊ !

ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, गंगामाई साखर कारखाना जो दर जाहीर करील त्यांच्या पेक्षा एक रुपया जास्त दर देवू असे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड तर कारखाना प्रशासनाच्या वतीने माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी या चर्चेत भाग घेतला.