
नगर : महायुती सरकारची महत्वाची योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली (Confession)दिली आहे. १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी, तर ९५२६ शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी १४.५० कोटी रुपये लाटल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Ladki Bahin Yojana)
प्रत्येक गावात जिल्हा बँके मार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्रीच असल्याचंही समोर आलं आहे. या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र अजूनही शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरसकट सगळ्या महिलांनी अर्ज केले होते. सुरूवातीला या योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी होती. मात्र काही जिल्ह्यांत डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला, अशी माहिती समोर आली आहे.
अवश्य वाचा: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसुली होणार (Ladki Bahin Yojana)

सिस्टममध्ये झालेल्या चुकांमुळे पुरुषांचे अर्जही मंजूर झाले. सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर या योजनेत फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा, यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पूर्तता करत असतानाच यामध्ये शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं आहे. शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.


