Radhakrishna Vikhe Patil | नगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचतगटांच्या खाद्य पदार्थांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील महिला बचतगटांनी उभारलेल्या स्टॉलमधून विविध खाद्यपदार्थांची चव जिल्हावासीयांना चाखता येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : अक्षय कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; कारवाईची मागणी
फेस्टिव्हल प्रदर्शनाच्या भेटी प्रसंगी
जिल्हा परिषद, अहिल्यानगर व जनसेवा फाउंडेशन, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित ‘अहिल्यानगरची जत्रा’ फूड फेस्टिव्हल प्रदर्शनाच्या भेटी प्रसंगी पालकमंत्री डॉ.विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गोडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अवश्य वाचा : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही खाद्यजत्रा आयोजित करण्यात आली असून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील बचतगटांना ७८ कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच राज्यात १ लाख ८० हजार ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यात सर्वाधिक लखपती दीदी तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. गतकाळात ‘साई ज्योती’ उपक्रमातून जिल्ह्यातील बचतगटांना मोठी चालना मिळाली असून येत्या काळातही महिलांना विविध व्यवसायांद्वारे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत असेच उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पालकमंत्री डॉ.विखे पाटील यांच्या संकल्पनेतून खाद्य महोत्सव उपक्रम राबविण्यात आला आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करत कुटुंबाचा भक्कम आधार बनविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. महिलांची ओळख एक यशस्वी उद्योजिका म्हणून निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, खाद्य महोत्सवाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यातील बचतगटांसह राज्यातील ९ जिल्ह्यांतील महिला बचतगटांचे स्टॉल उभारण्यात आले असून विविध पारंपरिक तसेच आधुनिक खाद्यपदार्थांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार बचतगटांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख ११ हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. या गटांना आतापर्यंत ३५३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी फूड फेस्टिव्हलमध्ये विविध स्टॉलना भेट देत स्थानिक खाद्यपदार्थ व उत्पादनांची माहिती घेतली. जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व उत्पादनांचे त्यांनी कौतुक केले.



