Kopargaon : नगर : सोयरे धायऱ्यांच्या राजकारणासाठी ओळखला जाणारा अहिल्यानगर जिल्हा हा तेवढाच पिढीजात संघर्षासाठी देखील ओळखला जातो. या जिल्ह्यातील कोपरगाव हा मतदारसंघ म्हटला की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जेव्हा आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा विवेक कोल्हे देखील उमेदवारीच्या तयारीत होते. मात्र भाजपच्या विनंतीवरून ते थांबले व काळे आमदार झाले. कोल्हे यांच्या त्यागाची दखल घेत भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. यामुळे पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे दोघेही आमदार विधान परिषदेत दिसणार.
हेही वाचा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात
काळे-कोल्हे संघर्ष
काळे व कोल्हे यांचा पिढीजात सुरू असलेल्या संघर्ष त्यांच्या तिसऱ्या पिढीतही सुरूच आहे. कारण कोपरगाव मतदारसंघांमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना महायुतीच्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. तर विधानसभेसाठी भाजपकडून विवेक कोल्हे हे देखील इच्छुक होते. यामुळे मतदारसंघातच राजकीय पेच निर्माण झाला. यावेळी भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांची समजूत काढत त्यांना माघार घेण्यास सांगितले व कोपरगाव मतदारसंघांमध्ये काळे हे आमदार झाले.
नक्की पहा : विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करताच विवेक कोल्हे म्हणाले…
राजकीय वारसा (Kopargaon)
विवेक कोल्हेंना मोठा राजकीय वारसा लाभला असून त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावच्या माजी आमदार राहिल्या आहेत. तर आजोबा शंकरराव कोल्हे हे तालुक्याचे सहावेळा आमदार राहिले होते. विधान परिषदेसाठी भाजपनं त्यांना संधी देताना भविष्याचा विचार केलेला आहे. विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणावरही मोठी छाप पाडली आहे.



