Farmer : नगर : राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे शनिवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. “कर्जमाफीवरील सर्व अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करू,” असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला. शेतकरी, सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनानंतर नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सातबारा कोरा करा
यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार हल्लाबोल करत, “सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली अटींची मोठी गाळण लावून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे. शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करायचा असेल तर सातबारा कोरा करा आणि उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्या,” अशी मागणी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गावागावांत आंदोलनाची ठिणगी पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नक्की पहा : एक हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत योग दिन साजरा
यांचा सहभाग (Farmer)
या आंदोलनात राजेंद्र म्हस्के, अनिल घनवट, हेमंत नलगे, बाळासाहेब नाहाटा, झेंडे महाराज, हरिदास आबा शिर्के, बाळासाहेब नलगे, पुरुषोत्तम लगड, मारुती भापकर, राजेंद्र नागवडे, भाऊसाहेब नेटके, स्मितल वाबळे यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



