Dharmendra Pradhan : नगर : नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या गोंधळात अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा दिला आहे. केंद्र आणि कॉक्रोच जनता पार्टीसोबत (Cockroach Janata Party) दुपारी साडेतीन वाजता चर्चेची तिसरी फेरी पार पडणार होती. त्यापूर्वीच प्रधान यांनी त्यांचा राजीनामा दिलेला असून, मोदींनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हा पदभार कुणाकडे सोपवण्यात आला आहे हेदेखील समोर आलेले नाही.
नक्की वाच : विद्यार्थ्यांच्या नखालाही धक्का लागला तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही : नगरसेवक कुमार वाकळे
राजीनामा पत्रात नेमकं काय?
गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणा यासाठी समर्पितपणे कार्य करत आलो आहे. माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, सक्षम, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षणव्यवस्था हीच सक्षम राष्ट्राची भक्कम पायाभरणी असते. देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या युवा पिढीची स्वप्नं पूर्ण करणं, हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली राष्ट्रसेवेची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (Dharmendra Pradhan)
मात्र, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत काही अनियमितता समोर आल्या. भारत सरकारने तातडीने दखल घेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची घोषणा केली. तसेच, पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित (Computer-Based Test) पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. या काळात आमचं सर्वात मोठं प्राधान्य होतं की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी, पालक आणि सर्व संबंधितांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.
विद्यार्थ्यांची दिशाभूल केली
पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही पळ काढला नाही. कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भविष्य परीक्षा माफियामुळे उद्ध्वस्त होऊ नये आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, हा माझा ठाम निर्धार होता. १६ जुलै रोजी जाहीर झालेल्या NEET-UG निकालांमध्ये अनेक गरीब कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळालं, याचं समाधान आहे. मात्र, या संपूर्ण काळात काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझं मन अत्यंत व्यथित झालं.
लोकशाहीच्या सामर्थ्यावर माझा नेहमीच अढळ विश्वास राहिला आहे. देशातील तरुणांच्या आकांक्षा, स्वप्नं आणि अपेक्षांचा मी नेहमी आदर केला आहे. ते केवळ भारताचं भविष्य नाहीत, तर विकसित भारताचे शिल्पकार आहेत. गेल्या दहा दिवसांतील घडामोडी पाहून मला अत्यंत दुःख झालं. हा विषय माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नाही.
भारताची युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद
देशातील युवा शक्तीला कोणत्याही भ्रमजाळात अडकू देणार नाही, हा माझा संकल्प आहे. जंतर-मंतरवर आणि देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी अभ्यास व करिअरवर लक्ष केंद्रित करावं, या विचाराने मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे सुपूर्द केला आहे.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन, विश्वास आणि सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली त्या सर्वांचेही मी ऋणी आहे.राष्ट्रसेवा हीच माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी मी सदैव समर्पित राहीन प्रभू श्रीजगन्नाथ यांच्या आशीर्वादाने भविष्यातही भारतमाता, ओडिशातील जनतेची आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रत्येक स्तरावर स्वतःला समर्पित ठेवेन. असे या पत्रात लिहीले आहे.



