
Pune-Nashik Semi-High-Speed Railway : संगमनेर : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi-High-Speed Railway) प्रकल्पाच्या मागणीसाठी प्रस्तावित करण्यात आलेले चक्काजाम आंदोलन (Chakka Jam Protest) सर्वपक्षीय असल्याचा दावा केला जात असला, तरी या आंदोलनाबाबत आपल्याला कोणाचाही फोन अथवा निरोप आलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन सर्वपक्षीय नसून एका कुटुंबापुरते आणि राजकीय कुरघोडीपुरते मर्यादित असल्याची टीका आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी केली.
नक्की वाचा : समर्पण चातुर्मासात रविवारी २.५ कोटी सामूहिक नवकार महामंत्र जाप कार्यक्रम
आपली भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे झाली पाहिजे, ही आपली भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचे सांगत आमदार खताळ म्हणाले, “पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा संगमनेर आणि संपूर्ण परिसराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी मी पूर्णपणे आग्रही आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा शब्द दिला आणि तो शब्द पाळत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वीच आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा तज्ज्ञ समितीचा निष्कर्ष समोर येणे अधिक महत्त्वाचे आहे.”
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आंदोलन हे जनतेच्या प्रश्नासाठी असावे (Pune-Nashik Semi-High-Speed Railway)
आमदार खताळ पुढे म्हणाले, “काकोडकर समितीचा अहवाल काय येतो, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अहवाल सकारात्मक आला तर आपण त्याचे स्वागत करू. मात्र, अहवाल प्रतिकूल आला आणि संगमनेरच्या हक्काच्या मार्गाला नकार दिला गेला, तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम मीच रस्त्यावर उतरेन. जनतेच्या हक्कासाठी वेळप्रसंगी उपोषण करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही.” पुढे बोलताना आमदार आमदार खताळ म्हणाले “लोकशाहीत व्यवस्थेत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन हे जनतेच्या प्रश्नासाठी असावे, राजकीय श्रेयासाठी नव्हे. जनतेला वेठीस धरून किंवा वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून राजकीय कुरघोडी साधणे योग्य नाही.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी पूर्णपणे आग्रही
पुणे-नाशिक रेल्वे हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा विषय नसून संगमनेर, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिकच्या भवितव्याशी जोडलेला विकासाचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नावर प्रामाणिकपणा, सर्वसमावेशकता आणि एकजूट अपेक्षित आहे,” असेही खताळ यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या प्रश्नावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समवेत नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपण या प्रकल्पासाठी ठोसपणे पाठपुरावा केल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आग्रह धरल्याचे सांगितले. केंद्र सरकारही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे खताळ यांनी नमूद केले. दरम्यान ते म्हणाले “पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आपण पूर्णपणे आग्रही आहोत.
हा प्रकल्प संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा
या प्रकल्पामुळे संगमनेरला पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांशी जलद रेल्वे जोडणी मिळणार असून, उद्योग, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे हा प्रकल्प संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.” “काकोडकर समितीचा अहवाल या प्रकल्पाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अहवाल सकारात्मक आला तर त्याचे स्वागत करू; मात्र प्रतिकूल अहवाल आल्यास कोणत्याही दबावाला न जुमानता जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे. संगमनेरच्या विकासाच्या प्रश्नावर मी कोणतीही तडजोड करणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.


