MNS : पारनेर : तहसीलदारांच्या (Tehsildar) शासकीय गाडीवरील काळ्या काचा काढून कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS), पारनेर तालुक्याच्या वतीने आज (ता. २९) अहिल्यानगर येथील उप अधीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मनसे तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील बेकायदेशीर काळ्या काचांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
नक्की वाचा : गुन्हेगारांना मुभा नाही, आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार : डॉ. सुजय विखे
RTO अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
आंदोलनाची तीव्रता वाढल्याने RTO उप अधीक्षक माधव सूर्यवंशी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “उद्या लेखी स्वरूपात खुलासा देतो,” अशी विनंती केली. मात्र, मनसेच्या आक्रमक पदाधिकाऱ्यांनी त्यांची ही विनंती स्पष्टपणे धुडकावून लावली. “सामान्य नागरिकांच्या वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाते, मग सामान्य माणसाला तुम्ही असाच रस्त्यावर वेळ देता का?” असा संतप्त सवाल करत अविनाश पवार यांनी RTO अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. चर्चेदरम्यान सूर्यवंशी यांनी बैठकीचे कारण पुढे करत “मी निघतो, तुम्ही कारवाई करा,” असे सांगितले. यावर अधिक आक्रमक होत पवार यांनी, “तुम्ही मीटिंगला जाऊ शकता, पण जोपर्यंत कारवाईचा लिखित पुरावा आमच्या हातात देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून तिळमात्रही हलणार नाही,” असे स्पष्ट करत आपला ठिय्या कायम ठेवला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण (MNS)
शासकीय वाहनांवर लावण्यात आलेल्या काळ्या काचांमुळे न्यायालयाच्या आणि वाहतूक नियमांच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाने तोंडी आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष आणि लिखित स्वरूपात कारवाईचा अहवाल सादर करावा, या मागणीवर मनसेचे कार्यकर्ते ठाम आहेत. जोपर्यंत कारवाईचा अधिकृत आणि लिखित पुरावा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार मनसे नेते अविनाश पवार यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे RTO कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



