ZP Ahilyanagar | नगर : बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवार (ता.१०) पासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील (ZP Ahilyanagar) शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात ६२ हजार ८०९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी ११६ परीक्षा केंद्र सज्ज परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा – ‘तौरल इंडिया’ औद्योगिक भविष्याचा मैलाचा दगड; खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

बैठे पथक नियुक्त (ZP Ahilyanagar)
१० बारावीची ते १८ मार्चपर्यंत बारावी परीक्षा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या संध्या गायकवाड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, योजना शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख, तहसीलदार व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्र स्तरावर दक्षता पथक तैनात आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही बसविण्यात आले आहे. केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी झुम अॅपचा वापर केला जाणार आहे.
अवश्य वाचा – श्रीगोंदा येथे रस्त्याच्या कामाविरोधात संभाजी ब्रिगेडचे ‘दशक्रिया आंदोलन’
भीतीमुक्त पेपर देता यावेत (ZP Ahilyanagar)
संवेदनशील केंद्र निश्चित करून तेथे परीक्षा कालावधीत राजपत्रित अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. केंद्राच्या १०० मीटर आतील झेरॉक्स दुकाने बंद असणार आहेत.दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा घेतानाच विद्यार्थ्यांना उत्साहात, आत्मविश्वासाने आणि भीतीमुक्त पेपर देता यावेत, याचीही प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या भौतिका सुविधा दिल्या जाणार आहेत, असेही सांगितले जात आहे.
हे पहा – अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी
संवेदनशील ३८ केंद्रांवर ड्रोनची नजर (ZP Ahilyanagar)
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. ११६ केंद्रांवर पोलीस नियुक्त असणार आहेत. याशिवाय ३८ संवेदनशील केंद्रांवर अधिकचा फौजफाटा नियुक्त करण्यात आलेला आहे. याशिवाय तेथे ड्रोनची नजर असणार आहे. तसेच सर्व खाते प्रमुख, तहसीलदार, बीडीओ, नगरपालिका सीओंचे बैठे पथक ‘त्या’ ३८ केंद्रांवर तळ ठोकून असणार आहे.



