Radhakrushn Vikhe Patil: शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी विसरू नका – जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrushn Vikhe Patil: शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी विसरू नका - जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrushn Vikhe Patil: शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी विसरू नका - जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrushn Vikhe Patil : नगर: “मैदानातील हार-जीत पेक्षा सहभाग महत्त्वाचा असतो. खेळात हार-जीत होतच असते, मात्र मनाने हारलेला माणूस आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे खेळाडूवृत्ती जोपासत अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा उभे राहिले पाहिजे. जलसंपदा विभागावर राज्याच्या शेतकऱ्यांची (Farmer) मोठी जबाबदारी असून, शेतकऱ्यांच्या प्रति असलेली ही बांधिलकी विसरू नका,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (Minister of Water Resources) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी केले.

उपस्थित अधिकारी

लोणी – शिर्डी येथे संपन्न झालेल्या जलसंपदा विभागाच्या पंचम राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या समारोप सोहळ्यास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता तथा स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रकाश मिसाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, ‘मेरी’ नाशिकचे महासंचालक संजीव टाटू, मंत्रालयाचे मुख्य अभियंता व सहसचिव राजेंद्र काटपल्लीवार, मुख्य अभियंता व सहसचिव प्रसाद नार्वेकर, पुणे येथील विनिर्दिष्ट प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश मोरे, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक सुनंदा जगताप, नागपूर येथील गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, जलविज्ञान व धरण सुरक्षितता विभागाचे मुख्य अभियंता सुदर्शन पगार, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिता विखे पाटील व शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके आदी उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचारी हीच या विभागाची खरी अनमोल ‘संपदा’ (Radhakrushn Vikhe Patil)

पालकमंत्री श्री.विखे म्हणाले, पाणी हे जीवन असून जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी हीच या विभागाची खरी अनमोल ‘संपदा’ आहे. दैनंदिन कार्यालयीन कामकाज व नियोजनाचा ताण बाजूला सारून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेतून आपल्यातील उत्तम क्रीडापटू व कलाकाराचे दर्शन घडवले, ही बाब कौतुकास्पद आहे. स्पर्धेतील हा उत्साह व ऊर्जा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातही कायम ठेवावी. पाण्याप्रमाणे प्रवाही राहून व चांगले आरोग्य राखून विभागाचे काम अधिक सक्षमपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: वांबोरी येथे चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा

शिर्डी ही साईबाबांची पुण्यभूमी असून येथून ‘श्रद्धा व सबुरी’चा संदेश मिळतो. सहकार चळवळीच्या माध्यमातून या परिसरात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे राहिले असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कन्यांनी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. या ‘स्त्री शक्ती’चा सन्मान व्हावा या उद्देशाने स्थानिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उपस्थित आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही आपले विचार मांडले. आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू कुमारी फिजा सय्यद यांनी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचा संदेश दिला. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या कोमल वाकळे यांनी कार्यालयात कामाची निष्ठा आणि मैदानावरील उत्साह यांचा मेळ घालण्याचे आवाहन केले. तसेच, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. शुभांगी दळवी यांनी “जल हे जीवन आहे आणि खेळ हा जीवनाचा आत्मा आहे,” असे सांगत हार-जीत पेक्षा खेळातून मिळणारा आनंद महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

नक्की वाचा: समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; एकाचा होरपळून मृत्यू

ही स्पर्धा प्रवरानगर व शिर्डी येथे ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत विविध १० विभागांत सुमारे १६५० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या तीन दिवसांच्या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ , छत्रपती संभाजीनगर यांनी पटकाविले. स्पर्धेचे ‘जलवीर’ हे बोधचिन्ह सर्वांचे आकर्षण ठरले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व शिर्डी साईबाबा संस्थान यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रकाश मिसाळ यांनी केले. आभार अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत व प्रतिभा पाटील यांनी केले.