child marriage : राहाता : तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘माझे गाव बालविवाह मुक्त गाव’ या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत ३१८ अंगणवाडी सेविकांनी एकत्र येत बालविवाहाच्या विरोधात ठाम भूमिका घेत समाजपरिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. यापुढे तालुक्यात एकही बालविवाह (child marriage) होऊ देणार नाही, असा एकमुखी संकल्प करत त्यांनी गावपातळीवर सक्रिय कृती (active action) करण्याची तयारी दर्शवली. या कार्यशाळेमुळे बालविवाहाच्या घातक परिणामांची जाणीव अधिक तीव्र झाली असून, प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची दिशा मिळाल्याचे सेविकांनी सांगितले. कार्यशाळेत सहभागी सेविकांनी स्पष्ट केले की, लहान मुलींच्या लग्नाच्या चर्चा सुरू होताच त्या संबंधित कुटुंबांशी संवाद साधून समुपदेशन करतील, बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगतील आणि कोणत्याही परिस्थितीत अशा घटना घडू देणार नाहीत. आपले गाव बालविवाहमुक्त करून संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अवश्य वाचा- राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा

बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम (child marriage)
या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, जिल्हा बाल संरक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन, स्नेहालय उडान प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, बालहक्क, सामाजिक कारणे व दुष्परिणाम, तसेच प्रभावी जनजागृती यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बालविवाह हा मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करणारा असून त्यांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्याला बाधा आणणारा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या प्रथेविरुद्ध उभे राहणे अत्यावश्यक आहे.
नक्की वाचा- ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
उपस्थितांनी घेतली बालविवाह विरोधी प्रतिज्ञा (child marriage)
याशिवाय, प्रभावी संवाद कौशल्य, संवेदनशीलता आणि तात्काळ कृती याबाबतही सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले. जोखमीतील कुटुंबांची ओळख पटवणे, प्रशासनाशी समन्वय ठेवणे आणि गरज पडल्यास त्वरित माहिती देणे यावर भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण केंद्राच्या दिपाली भोले यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाची माहिती दिली, तर बाल संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी शासकीय योजना व कायद्यांची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे राहुल वैराळ यांनी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकाविषयी जनजागृती करत तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमासाठी विविध अधिकारी व पर्यवेक्षिकांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अर्चना विखे व मंगल करपे यांनी आपल्या अनुभवातून गावपातळीवर प्रभावी काम करण्याची तयारी व्यक्त केली. राहाता तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी घेतलेला हा निर्धार केवळ घोषणेत मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास, गावागावात मोठा सामाजिक बदल घडू शकतो. राहाता बालविवाहमुक्त, अहिल्यानगर बालविवाहमुक्त हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



